Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



अन्नसुरक्षेची एशितैशी

*अन्न सुरक्षेची एशितैशी*
~ अनिल घनवट

मकर संक्रांतीचा दिवस होता. धुळे जिल्ह्यातील एका कार्यकर्त्यांच्या घरी जाणं झालं. आमचा पाहुणचार करत करत तो बरेच फोन ही लावत होता. थोड्या वेळाने, " जरा गावात जाऊन येतो " म्हणून गेला व अर्ध्या तासाने परत आला तो चिंताग्रस्त चेहेरा घेऊनच.
मी: काही प्रॉब्लेम आहे का?
तो: काही नाही हो, गव्हाला युरिया मारायचा होता. पर्वा पासून मजूर शोधतो आहे, कोणी कामालाच येत नाही.
मी: दुसरीकडे जात असतील.
तो: नाही हो, बसून आहेत कट्ट्यावर.
मी: संक्रांतीमुळे येत नसतील.
तो: नाही हो, येतच नाहीत. सरकार आता मोफत धन्य देतंय मग कशाला कामं करतील?
मी: तेला - मिठा पुरतं तरी कमवावं लागत असेल ना?
तो: कशाला? आज संक्रांत आहे म्हणून गावात गाड्या आल्या नाहीत , नाहीतर इतक्या वेळात चार पाच छोटा हत्ती येऊन गेले असते गावात. सगळं पुरवतात ते.
मी: म्हणजे?
तो: आहो हे जे गहू तांदूळ सरकार कुपणावर फुकट देते ना, ते कोणी फारसं खात नाही. जनावरांना घालतात किंवा या छोटा हत्तीवाल्यांना विकतात व पाहिजे तो किराणा घेतात. सगळं असतं गाडीत विकायला.

*पुन्हा वस्तुविनिमया पद्धतीकडे?*
देशाच्या अन्न सुरक्षेसाठी शेतकऱ्यांकडून कमीदरात खरेदी केलेल्या धान्याची पुढे कशी विल्हेवाट लागते हे पाहून आश्चर्य वाटले. इतक्यात एका छोटा हत्ती, ( छोटी मालवाहू मोटारगाडी) गाडीवर भोंगा लावून तांदूळ खरेदी करणारे आले. उत्सुकतेपोटी आम्ही गाडीजवळ गेलो. गाडीवाला आमच्या कार्यकर्त्यांच्या परिचयाचा होता त्यामुळे लगेचच गप्पा सुरु झाल्या.
साधारण १५ रुपये किलो प्रमाणे गहू व तांदूळ ते खरेदी करतात व त्या किमतीच्या मोबदल्यात रोज घरात लागणाऱ्या किराणा वस्तू देतात. रोख पैसे देत नाहीत. गाडीत सर्व किराणा व्यवस्थित लावलेला होता. तेल, मीठ, साबण, चहापवडर, मुरमुरे, फुटाणे, खारीक, खोबरे, भांडी घासायच्या घासण्या, घरात लागणारी छोटी प्लॅस्टिकची उपकरणे वगैरे सर्व. इतक्यात एक महिला आली व बासमती तांदूळ आहे का विचारले. गाडीवाला हो म्हणाला व ती महिला रेशनिंगचे तांदूळ आणायला गेली. गाडीवल्याने सांगितले की लोक हा तांदूळ खात नाहीत तो विकून १००/- रुपये किलोचा बासमती तांदूळ घेऊन खातात!!!
सगळे जग डिजिटल होत चालले आहे. डिजिटल इंडिया मात्र पुन्हा वस्तुविनिमय पध्द्तीकडे चालला आहे असे चित्र तयार झाले आहे.

*भ्रष्ट व्यवस्थेला रुपेरी किनार*
मोफत मिळालेले धान्य पुन्हा जमा करून निर्यात करण्यापर्यंतच्या या गोरख धंद्याची एक चांगली बाजू ही पुढे आली ती मांडणे आवश्यक आहे. या व्यवस्थेने हजारो तरुणांना रोजगार दिला आहे. एक गाडीमालक व एक मदतनीस यांची दोन कुटुंबे या धंद्यावर जगत आहेत. तांदूळ विकणाऱ्याला घर पोहोच किराणा समान मिळत आहे. बहुतेक महिलाच धान्य विकण्याचे काम करतात तेव्हा हा पैसा पुरुषांच्या नशेखोरीवर खर्च न होता गृहोपयोगी वस्तू खरेदी केल्या जात आहेत. गावात आलेल्या गाडीवाल्या तरुणाला विचारले किती मिळकत होते? तर म्हणाला डिझेल वगैरे सर्व खर्च जाऊन दोघांची रोजनदारी सुटते. "बर आहे ना, चोऱ्यामाऱ्या करण्यापेक्षा हे केलेलं बरं. आपल्या कष्टाचे आहेत जे मिळतील ते." गाडीवाला म्हणाला. शासनाच्या चुकीच्या समाजवादी नियोजनाचा ही जनतेने कसा आपल्या सोयीने उपयोग करून घेतला आहे.
ग्रामिण भागात होणारी रोजगार निर्मिती व या निमित्ताने का होईना गावातील लोक खारीक, खोबरं व बासमती तांदूळ खाऊ लागले आहेत ही जमेची बाजू.

*निर्यातीसाठी अन्नसुरक्षा?*
एका तालुक्याच्या गावात सुमारे ४०० छोटा हत्ती सारख्या गाड्या आहेत व जवळपासच्या ४०-५० किलोमीटर अंतरातील गहू तांदूळ ते खरेदी करून आणतात व तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या गोडाऊन मालकाला विकतात. त्या गावात तीन मोठे गोडाऊन आहेत. हे गोडाऊन मालक ट्रक भरभरून किराणा माल आणतात व या गाडीवाल्यांना पुरवतात. गोडाऊन मध्ये जमा झालेला गहू तांदळाचे कंटेनर भरून जातात.
आशा प्रकारे भारत भरातून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत वितरित केलेला गहू तांदूळ पुन्हा बाजारात येत आहे. तांदळाचा साठा थेट निर्यात करण्यासाठी पाठवला जात आहे. भारताने जी तांदळाची उच्चांकी निर्यात केली त्या मागे हे रहस्य आहे. फुकटचे धान्य नेमकी कोणाची अन्न सुरक्षा करत आहे? असा सवाल उपस्थित रहात आहे.
हा सगळा कारभार बेकायदेशीरपणे सुरू आहे मग याला प्रशासन रोखण्याचा प्रयत्न नाही करत का? मी त्या गावच्या कार्यकर्त्याला विचारले. त्याने सांगितले एकदा छापा पडला होता. मोठी रक्कम देऊन तोडपाणी केले व आता कायमची सेटिंग लावली आहे.
भारतातील जनतेच्या अन्न सुरक्षेसाठी २०२१-२२ मध्ये, २लाख त्रेपन्न हजार ९७४कोटी रुपयाची तरतूद केली होती. ८० कोटी लोकसंख्येला हे मोफत अन्न धान्य दिले जाते. इतक्या लोकांना अशी मदत देण्याची खरच गरज आहे का? यातील बरेच पोट भरण्यासाठी बाहेर गावी असतात. काही घेतच नाहीत, अनेकांची आर्थिक परिस्थिती चांगली असते. हा सगळा माल काळ्या बाजारातून पुन्हा दुकानात येतो, निर्यात ही होत आहे. याचा परिणाम थेट शेतात तयार होणाऱ्या पिकाच्या दरावर होतो. करदात्यांचा पैसा असा वाया जात आहे व कळ्याबाजाराला प्रोत्साहन देत आहे.

*कमी दराची हमी*
केंद्र शासन अन्नसुरक्षेच्या नावाखाली दर वर्षी लाखो टन गहू तांदूळ खरेदी करून ठेवते. नवीन पीक येण्या आगोदर ते खुल्या बाजारात विकत असते. या वर्षी केंद्र शासनाने २५ लाख टन गहू लिलाव करून विकणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याची किमान किंमत २३५०/- रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली आहे.
ऐन गहू कंपनी हंगामाच्या तोंडावर विक्रीस काढलेल्या या गव्हामुळे नवीन गव्हाच्या किमतीला मार बसणार आहे. त्यात गव्हाला निर्यातबंदी असल्यामुळे चांगले दर मिळण्याची काही शक्यता नाही. देशाच्या अन्नसुरक्षेसाठी अन्नदात्याच्या पोटावर लाथ मारण्यासारखा हा प्रकार आहे. मोफत धान्याच्या उपक्रमामुळे शेतीमालाच्या किमतीवर अनिष्ठ परिणाम तर होतोच पण शेतमजूर वर्गाला घरपोहोच सर्व मिळत असल्यामुळे ते काम करायला तयार नाहीत (विशेष करून पुरुष कामगार). शेतात मजुरीचा खर्च प्रचंड वाढला आहे. खते, औषधें महाग झाली आहेत, डीझलचा खर्च भरमसाठ वाढला आहे. त्यात शेतीमालाला भाव मिळणार नाही अशी सगळी व्यवस्था उभी करण्यात आली आहे. शेवटी शासनाने ठरवलेल्या, (उत्पादनखर्चापेक्षा कमी असलेल्या) हमी भावात आपला माल विकायला भाग पडणार.

*धान्या ऐवजी रक्कम लाभार्थीच्या बँकेत जमा करा*
देशातील जनतेच्या अन्नसुरक्षेसाठी सरकार आधारभूत किमतीने धान्य खरेदी करते व ते साठवून लाभार्थींपर्यंत पोहोचे पर्यंत ४०% आधीक खर्च करावा लागतो. बराचसे धान्य खराब होते, ते कमी भावात विकावे लागते. नवीन कृषी कायद्यांवर अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीत काम करताना आमच्या समितीने अशी शिफारस केली आहे की, लाभधारकला दिले जणाऱ्या धान्यावर ४०% अधिक खर्च करण्यापेक्षा आधारभूत किंमत अधिक २५% रक्कम त्या लाभधारकाच्या खात्यावर थेट जमा करण्यात यावी. त्या पैशाचे काय खायचे ते त्याला ठरवू द्या. तो अधिक पौष्टिक अन्न विकत घेऊन खाईल. यात सरकारच्या निधीची बचत होईल, भ्रष्टाचार कमी होईल व फक्त गहू तांदूळ खाण्या पेक्षा लाभधारक त्याला आवश्यक असेल ते खाईल आणि शेतमालाच्या किमतींवर अनिष्ठ परिणाम होणार नाही.
सरकारने या शिफारशींचा विचार करायला हवा. नाहीतर देशात भूकबळींपेक्षा शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त असेल. अन्नसुरक्षेसाठी अन्नदात्याच्या बळी देणे योग्य आहे काय? असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना,
धोरणकर्त्यांना कधी पडत नाही का?
२९/०१/२०२३

अनिल घनवट
राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पार्टी
९९२३७०७६४६

Share