श्रदांजली वाहण्याचा वैताग आलाय! : कोरोना माहात्म्य ||११||
![बापू ठाकरे](http://www.baliraja.com/sites/default/files/bapu-thakre.jpg)
अगदी सकाळी सकाळी श्री प्रभाकरराव झाड़े यांचा फोन आला आणि बापूंच्या निधनाची वार्ता कळली. शेतकरी संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते बापू ठाकरे (गिरोली. जि. वर्धा) यांच्यासोबत माझे संबंध १९८४ पासूनचे. अत्यंत मृदुभाषी स्वभाव व सात्विक वृत्ती देऊन जे काही मोजके लोक देव जन्माला घालतो त्यापैकी एक म्हणजे बापू. त्यांचे माझे नाते संघटनेचा सहकारी म्हणून तर होते पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. कोरोनाकाळातील मर्यादांमुळे ना त्यांची शेवटची भेट ना अंत्यदर्शन! माणूस म्हणून जगण्यावरच मर्यादा आल्यात!
गेल्या महिनाभरापासून माझ्या परिचितविश्वापैकी दररोज एक-दोन व्यक्ती जगाचा निरोप घेत आहेत. माझे परिचितविश्व कदाचित इतरांपेक्षा मोठे आणि व्यापक असेल आणि त्यामुळे मित्र-सहकारी परिवाराची संख्या मोठी असेलही; पण ती काही फक्त या महिन्यातील नसून नेहमीची आहे. मग अचानक याच महिन्यात असा काय एकदम बदल झाला की जे आजवर कधीच घडले नव्हते, ते घडायला लागले? एक सोसाट्याचे वादळ यावे आणि झाडाची फळे बदाबदा गळावीत असे एकदमच जाणवायला लागले आहे. कधीतरी मरणारच होते ते लगेच का मरायला लागले असावेत? पिकलं पान किंवा फळ कधी ना कधी गळणारच असते, पण ते लगेच थोडे गळत असते. पिकल्यानंतरही बराच काळ झाडावर टिकूनच असते. देह हा नश्वर आहे तो कधीतरी जाणारच असतो म्हणजे जाईपर्यंत तरी त्याचे अस्तित्व अबाधित असते ना? मग यापूर्वी नसलेली अशी निसर्गाची तऱ्हा अशी अचानकच कशी बदलायला लागली असेल? निसर्गाच्या कार्यपद्धतीत तर सूक्ष्मसा बदल व्हायला देखील हजारो वर्षे लागत असतात.
या मृत्यूंचा कोरोना आपत्तीशी काहीएक संबंध नाही असे मीच ठासून सांगू इच्छितो. कारण त्यामुळे "या मृत्यूसत्राशी कोरोनाचा अजिबात संबंध नाही" असे म्हणायची तुम्हाला संधी मिळणार नाही. या मृत्युसत्राचा कोरोनाशी संबंध नाही असे म्हणण्याचा तुमचा विचार मी संपवून टाकला आहे आणि या मृत्युसत्राचा कोरोनाशी संबंध आहे, असे तर तुम्ही म्हणणारच नाहीत. मग आता तुम्ही काय म्हणणार? म्हणायला काहीच उरले नाही ना? मग आता एक करूयात. डोक्याला अजिबात ताप न देता मनाला येईल तसे ठोकून द्यायला आपली जीभ खाडकन बाहेर पडत असते ना? तीच जीभ आत घेऊन दातांच्या मागे सापासारखी गुंडाळून ठेऊयात, जेणेकरून डोक्याचा वापर करायला जराशी उसंत मिळू शकेल.
जनतेमध्ये कोरोना प्रतिकारक अँटीबॉडीज तयार व्हाव्यात म्हणून लॉकडाऊन संपवून पूर्ववत संचारसुविधा सुरु कराव्यात अशी अनेकांची आग्रही मागणी होती. संचारबंदी संपली. किरकोळ अपवाद वगळता दळणवळण सुरु झाले. संक्रमित लोकांना क्वारंटाईन करण्याचे प्रकार केवळ नावापुरते व कागदावर नोंदवण्यापुरतेच उरले. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कोरोना विषाणूला प्रसारण पावण्यासाठी हजार वाटा उपलब्ध झाल्यात. कोरोनामुळे माणसे मेली की शासन व प्रशासनावरचे दडपण वाढते. कोरोनाचे निदान न होताच परस्पर माणसे मरून परस्पर विल्हेवाट लागली तर ते शासन-प्रशासनाच्या दृष्टीने हिताचे असते. त्यामुळे परस्पर माणसे दगावत असतील तर त्या मृत्युसत्राशी कोरोनाचा संबंध जोडणे कुणालाही परवडणारे नाही.
मी वैज्ञानिक, विज्ञानवादी, वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे असल्या शब्दजंजाळात फसत नाही. पण विज्ञानाचा विद्यार्थी असल्याने शक्य तेवढ्या प्रश्नाचे उत्तर शोधत असतो आणि जाणकारांकडून उत्तर मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. म्हणून जिज्ञासेखातर दोन-तीन अगदी साधे प्रश्न आपल्यासमोर जाहीरपणे ठेवतोय. कृपया उत्तर शोधावे आणि तुम्हाला उत्तर गवसले तर मलाही आवर्जून अवगत करावे.
.
-
कोरोना (covid-19) तसा फार नवखा आहे. त्याची सकृतदर्शनी ओळख व्हायला अजून एक वर्षही व्हायचे आहे. अशा स्थितीत त्यावर व्यापक संशोधन झाले आहे असे म्हणता येईल का? सध्याच्या उपलब्ध टेस्ट पद्धतीत -Ve येणारा व्यक्ती covid-19 निगेटिव्हच असेल असे छाती ठोकून सांगता येईल, इतका अभ्यास व संशोधन होऊन टेस्ट पद्धती विकसित झालेल्या आहेत का? covid-19 टेस्ट मधून मिळालेला निष्कर्ष म्हणजे अंतिम निवाडा आहे का?
-
कोरोनामुळे मानवी शरीरावर होणारा प्रभाव सध्या वर्तवला जातो, लक्षणे सांगितली जातात... ती तरी अंतिम आहेत का? त्यापेक्षा अन्य वेगळी लक्षणे नसूच शकतात का?
-
माझ्या माहितीप्रमाणे दरवर्षी जुलै ते ऑक्टोबर या काळात सर्वात जास्त नैसर्गिक (म्हणजे फ़क्त अपघात सोडून) मृत्यु होत असतात. याविषयी आकडेवारी उपलब्ध असू शकते ती कुणी सांगू शकेल का? दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात सर्वात जास्त मृत्यू होत असतील तर नक्कीच या महिन्यातील मृत्यूशी कोरोनाचा संबंध नाही. पण दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सर्वात जास्त मृत्यू होत नसतील तर कारण तर शोधायला नको का ?
-
काळाच्या प्रवाहात जो टिकतो तोच जगतो. एका सूक्ष्मशा कोरोना विषाणूने ज्या तऱ्हेने मनुष्यजातीची त्रेधातिरपट उडवली आहे ते पाहता पुढील भविष्यात मनुष्यजातीसमोर कोणते आणि कशाचे ताट वाढून ठेवले आहे........ निदान याचा तरी थोडाफार वेध घेऊन त्यानुरूप मनुष्यजातीने स्वतःच्या अस्तित्वासाठी पावले टाकायला नको का?
-
कोरोना संकट पुरेपूर नियंत्रणात येईपर्यंत निवडणुकीचे राजकारण टाळले तर देशावर महाभयानक विपत्ती कोसळणार आहे का?
- गंगाधर मुटे आर्वीकर
==============
![korona](http://www.baliraja.com/sites/default/files/Sahsik-11.jpg)