Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



शेतीसाहित्यात तंत्रज्ञान साक्षरतेची मुहूर्तमेढ रोवणारं संमेलन सातवे अखिल भारतीय मराठी शेतकरी (आभासी) साहित्य संमेलन वृत्तांत

शेतीसाहित्यात तंत्रज्ञान साक्षरतेची मुहूर्तमेढ रोवणारं
सातवे अखिल भारतीय मराठी शेतकरी (आभासी) साहित्य संमेलन : वृत्तांत
 
असं म्हणतात कि,अचानक आपत्ती कोसळल्यावर मनुष्य विचलित होतो. तो थांबतो. पुढे पडणाऱ्या प्रत्येक पावलागणिक आत्मविश्वासाची जागा, आपसूकच सावधानतेचा वेध घेताना चाल मंदावत जाते. अश्या काळात सावध राहणे, हिच एक गोष्ट त्याच्या आवाक्यात असते. आपण सर्व वर्षभर कोरोनाच्या आपत्तीने ग्रस्त व त्रस्त आहोतच. यात आपल्या आयुष्याचा नैसर्गिक तोल ढासळत गेलेला आहे. आता हे मान्यच करावे लागेल. पण काही माणसांची मुळं इतकी खोलवर रुजलेली असतात की, आपत्तीला इष्टापत्ती समजून ते त्या आपत्तीवर स्वार होतात आणि हे दृश्य इतकं भारावून टाकणारं असतं, की त्राण गेलेल्यांनाही ते संजीवक ठरावं, इतपत प्रेरणादायी काम उभं राहत असल्याच पाहून आपणही त्या नैसर्गिक तोल सावरण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने पाउले टाकण्यास सज्ज होतो. 
 
  असंच काहीसं झालं, सातव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या निमित्याने. शेती अर्थ प्रबोधिनी व्दारे शिक्षण, साहित्य, आरोग्य, तंत्रज्ञान साक्षरता, शेतकरी स्वावलंबन, दत्तक योजना, निवासी प्रशिक्षण शिबिरे, शेतकरी मेळावे, परदेशी शेती अभ्यास दौरे, स्त्रीस्वावलंबन, असे विविधांगी उपक्रम, सामाजिक जाणिवेतून वर्षभर, स्थानिक पातळीवरून ते राज्यस्तरावर सातत्याने सुरू असते. त्यातील शेतकरी साहित्य चळवळीचा लोकाभिमुख उपक्रम म्हणून दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन केल्या जाते. आतापर्यंत पार पडलेली सहा संमेलने हि प्रामुख्याने, महाराष्ट्रातील भौगिलिक दृष्टया, अगदी पिकांच्याही वैविधतेने आपापल्या प्रांताचे  वैशिष्ट्य जपत असलेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात, विशेषत: शहरी भागात पार पडली होती. यंदा प्रथमच संमेलनाचे आयोजन, ग्रामीण भागात नियोजित होते. युगात्मा शरद जोशी यांनी जीर्णोद्धार केलेलं भारतातील एकमेव सीतामातेचं  मंदिर असलेल्या, जिल्हा यवतमाळ, राळेगाव तालुक्यातील रावेरी या छोट्याश्या गावात.
 
या संमेलनाची आखणी ही महिला सक्षमीकरण हा विषय केंद्रस्थानी ठेवून केलेली होती. ही प्रेरणा थेट युगात्मा शरद जोशी प्रणीत चांदवडची शिदोरी, लक्ष्मिमुक्ती चळवळीच्या मुळाशी जाताना दिसते. सर्वार्थाने वेगळं आणि प्रचंड उत्सुकता असलेलं मराठी साहित्य विश्वातील लक्षवेधी संमेलन. अगदी नियोजित तारखेच्या पंधरा दिवसापूर्वी कोरोना अरिष्ट्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात रद्द करून पुढे ढकलावे लागले.
 
खरं म्हणजे इथे सावध पवित्रा घेण्यात आलेला होता, जो सर्वार्थाने योग्य होता पण मी वर म्हटल्याप्रमाणे आपत्तीवर स्वार होवून, अगदी नियोजित तारखेपासून, पुढील सात दिवस, दररोज साधारण अडीच तासाचे एक सत्र, या स्वरूपात झूम प्रणालीचा अतिशय सक्षमपणे वापर करून, त्याचे प्रक्षेपण फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून एकूण अठरा तास, पर्यायी संमेलन, वेबमिलन सप्ताहाच्या माध्यमातून, नियोजित कार्यक्रम पत्रिकेतील नव्वद टक्के भाग, तंत्रज्ञानाच्या मदतीने यशस्वीपणे पार पाडण्यात आला. महाराष्ट्रातील अनेक सन्माननीय प्रतिष्ठित संस्थानी आपली वार्षिक नियोजित संमेलने पुढे ढकलली असताना, कमीत कमी साधनात, प्रचलित तंत्रज्ञानाचा कल्पकपणे जास्तीत जास्त वापर करून पार पडलेले, सातवे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, जिथे सातशे-आठशेच्या उपस्थितीत होणारे बंदिस्त सभागृहातील संमेलन, फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून विश्वस्तरावर पोचल्याने, साहित्य विश्वात रोल मॉडेल ठरले आहे. या संमेलनाचे आयोजक कार्यवाह, निमंत्रक, तंत्रज्ञ अशी अष्टपैलू कामगिरी करणारे संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री. गंगाधर मुटे सर यांनी अनेक तांत्रिक अडचणीवर मात करून असीम जिद्दीने संमेलन यशस्वी करून दाखविले आहे.
 
दिनाक २० मार्च २०२१ वेबमिलन सप्ताहाच्या प्रथम चरणात, दुपारी ११.०० वा नियोजित संमेलनाचे उद्घाटन सत्र तांत्रिक अडचणीवर मात करीत सुमारे १ तास उशीराने सुरू झाले. उद्घाटनसत्राच्या सूत्रसंचालिका प्रा. मनीषा रीठे यांच्या 'माती आणि माता! फरक वेलांटीचा!  एक जन्म देते ! दुसरी कुशीत घेते' अश्या माती आणि मातेचं अव्दैत अधोरेखित करणाऱ्या शब्दांनी..! संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ शेतकरी नेत्या आ. सरोजताई काशिकर यांच्यावतीने संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री. गंगाधर मुटे यांनी दिपप्रज्वलन करून, ऑनलाईन वेबमिलन सप्ताहाचे उद्घाटन केले. त्यानंतर श्री. गंगाधर मुटे लिखित 'अवनीवरती घाम गाळतो त्या देवाला नमन मी करतो'  या गीतातून अखिल विश्वातील समस्त कष्टकऱ्याचा श्रमाला नमन करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. स्थानिक बालकांच्या सुश्राव्य सुराला वाद्यवृंदाची तेवढ्याच तोलमोलाची साथसंगत लाभल्याने वातावरण भारावून गेले.
 
उद्घाटन सत्रातील आपल्या उद्घाटकीय मनोगतात शेतकरी संघटनेच्या ज्येष्ठ नेत्या आ. सरोजताई काशिकर यांनी, सर्वप्रथम श्री. गंगाधर मुटे यांच्या, साहित्य चळवळीच्या समग्र कार्याचा गौरव करून, शेतकऱ्याचं साहित्य नेमकं कसं असावं याचा घटनाक्रमानं बारकाईने अभ्यास करून युगात्मा शरद जोशीनी सुरुवात केली. पुढे तीच प्रेरणा घेऊन नव्या दमानं श्री. गंगाधर मुटेनी, शेतकरी साहित्य चळवळीच्या रूपाने केली. या संमेलनातून शेतीच अर्थशास्त्र, उद्योग साहित्य निर्माण व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करून संमेलनास शुभेच्छा दिल्या.
 
आपल्या प्रास्ताविकरूपी बीजभाषणात संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री.गंगाधर मुटे सरांनी, सुरवातीला गत सहा  संमेलनाचा आढावा घेवून, रावेरी या ठिकाणाचे आध्यात्मिक महत्त्व सांगताना, ज्याप्रमाणे कुठलीही चूक नसताना रामायणकाळी सीतामातेस वनवास भोगावा लागला, उपेक्षीत जिणं नशिबी आले. त्याच प्रमाणे शेतकऱ्याचे जगण्यामरणाचे प्रश्नही कायम उपेक्षीतच राहीले. उपेक्षीतांच्या दुःखाकडे जगाचे लक्ष जावे, या ठिकाणा पासून प्रेरणा मिळाव्यात. शेतीच्या उपेक्षित प्रश्नाकडे जगाच लक्ष जावे, येथे यावे अन या अबोलतेला आपल्या लेखणीतून बोलतं करावं. पुढे शेतकऱ्यांच्या समस्या आणि साहित्य संमेलन आयोजनाचे औचित्य, यांचा सहसंबंध स्पष्ट करताना म्हणाले की, जो पर्यंत विचारांची दिशा बदलत नाही तो पर्यंत माणसांची वर्तवणूक बदलत नाही. समाजातील शेतकरी विरोधी समज बदलण्याकरीत साहित्य दुरुस्त करावे लागेल. मनुष्याची जडणघडण ही पुस्तकातून होत असते. त्या अनुषंगाने शेतकरीवर्गाचं, खरंखुरं प्रतिबिंब प्रामाणिकपणे साहित्यातून मांडण्यात यावं. उगाच कल्पना विश्वात रममाण होवून आभाशी काव्यकल्पनातून खरं दुखणं कधीही मांडल्या जाऊ शकत नाही. किंबहुना ते शेतकऱ्यांना कोणताही न्याय देऊ शकणार नाही. कारण ते दुख: मानवनिर्मित आहे. आज समाजात विविध वडिलोपार्जित व्यवसायात, नोकरीत युवा पिढी स्वेच्छेने सामील होताना दिसते. मात्र शेतकऱ्याचा मुलगा, शेतकरी होण्यास नकार देते. त्याची मानसिकताच शेतीविरोधी झाल्याचे वास्तव प्रकर्षाने दिसून येते. आज खेड्याची स्थिती ही रस काढून घेतलेल्या चोथ्या सारखी झालेली आहे. गावात राहायला कुणीही तयार होत नाही. गावातील जातिवंत प्रतिभा शहराचा आश्रय घेताना दिसत आहे. गावात राहतो तो फक्त शेतकरी. यातून त्याच्या वाट्याला चांगलं उत्त्तम असं काहीही येत नाही. अगदी आज शेतकऱ्याच्या मुलास कुणी मुलगी द्यायलाही तयार होत नाही. हे जळजळीत वास्तव आहे. अश्या मूलभूत समस्या साहित्यात आल्या पाहिजेत.
 
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याबाबत एक महत्त्वाचे भाष्य नोंदविताना दंभस्पोट करीत श्री मुटे सर म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य का मिळाले पाहीजे? या प्रश्नावर खुद्द महात्मा गांधींनी दिलेले उत्तर हे लटिकेपणाच उदाहरण आहे. कारण इंग्रज भारताला लुटतात म्हणून देश गुलामीत गेला. यावर विस्तृतपणे भाष्य करताना म्हणाले की, गुलामीच्या काळात व्यापाऱ्यांना आडकाठी नव्हती. नोकरदारांनाही फुकटात वापरून घेण्यात येत नव्हतं. सेवेचा मोबदला वेतनाच्या स्वरूपात मिळतच होता. मग लूट नेमकी कुणाची होत होती? तर कच्च्या मालाची, शेतीची, शेतीत केलेल्या गुंतवणूकीची, श्रमाची, पर्यायाने इथल्या कष्टकरी शेतकऱ्याची, पोशिंद्याची. इथला कच्चा माल विदेशात नेऊन त्यावर संस्कार करून पुन्हा तो इथे चढ्या दराने विकल्या जात असे. मग गुलाम कोण होते?  तर शेतकरी. आज स्वातंत्र्यानंतरही ही लूट अव्याहतपणे वेगवेगळ्या माध्यमातून होत आहे. या सर्व विषयावर जो पर्यंत वस्तुनिष्ठपणे मंथन होत नाही, तो पर्यंत वैचारिक अमृत निघणार नाही. त्या करीत वास्तव साहित्य निर्मितीसाठी संमेलनाची आवश्यकता आहे. अतिशय परखडपणे शेतीतील वास्तव आपल्या घणाघाती प्रहाराने मुटे सरांनी प्रास्ताविकातून संमेलनाची भूमिका मांडली.  
 
संमेलनाध्यक्ष आदरणीय वसुंधरा काशिकर आपल्या संमेलनाध्यक्षाच्या मनोगतातून, सर्वप्रथम युगात्मा शरद जोशीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, त्यांच्या परीसस्पर्शातून मिळालेल्या वैचारिक ताकतीनेच आज मला संमेलनाध्यक्ष पदाचा मान मिळत असल्याचे नमूद केले. पुढे साहित्यात स्त्री ही पुरुषाच्या तुलनेत कायम उपेक्षीत राहिलेली आहे. पुरुषावर विपुल प्रमाणात साहित्य निर्मिती झालेली आहे. अगदी रामायण महाभारत कालीन कर्ण, लक्ष्मण, यांच्या तुलनेत वृषाली उर्मिला ह्या उपेक्षितच राहिलेल्या आहे. शेतकरी साहित्यातही, रवींद्र शोभणे, शेषराव मोहिते, प्रकाश देशपांडे, तान्हाजी पाटील, सदानंद देशमुख, कृष्णात खोत, इंद्रजित भालेराव, कैलास दौड, महेंद्र कदम असे सन्माननीय अपवाद वगळता फारसे लेखन झालेले नाही. त्यामानाने हिंदी साहित्यात विपुल प्रमाणात लेखन झाल्याचे निरीक्षण नोंदविताना, मुंशी प्रेमचंद यांच्या, प्रेमाश्रय, गोदान, कर्मभुमी या साहित्यकृती मधून शेतकरी जीवनाच्या सर्वच पैलूवर फार बारकाईने लेखन करण्यात आलेले आहे. मैथिलीशरण गुप्त यांच्या कविता, संजिव यांच्या फास या कादंबरीत शेतकरी आत्महत्येचे वास्तव मांडले आहे. धुमिल याच्या कवितेतून व्यवस्थेला प्रश्नांकित केल्या गेले. असे आपल्या साहित्यात का होत नाही हा मोठा प्रश्न आहे. सन नंतर  २००० नंतर शेतकरी आत्महत्येवर एकही कादंबरी लिहिली गेली नसल्याचे निरीक्षण नोंदविले. संमेलनास शुभेच्छा दिल्या. 
 
       उद्घाटन सत्रात संमेलनाचे संयोजक आ. बाळासाहेब देशमुख, विश्वस्त सीतामंदीर रावेरी आणि कवयित्री लक्ष्मी बल्की प्रामुख्याने उपस्थित होते. सत्राची सांगता मा. राजेंद्र झोटिंग याच्या आभार प्रदर्शनाने झाली.
*****
दिनांक २१ मार्च रोजी व्दितिय चरणात, ऑनलाईन कवी संमेलन, पालघर येथील प्रसिद्ध कवयित्री आ.अनुपमा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या सत्राचे प्रभावी सूत्रसंचालन कवयित्री लक्ष्मी बल्की यांनी केले. 
दिनांक २२ मार्च रोजी तृतीय चरणात, ऑनलाईन शेतकरी मुशायरा, नागपूर येथील येथील प्रसिद्ध गझलकार कवयित्री आदरणीय चित्रा कहाते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सत्राचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन गझलकारा आदरणीय प्राजक्ता पटवर्धन यांनी केले. एरवी कुठल्याही व्यासपीठावर आयोजित न होणारा, केवळ शेतकरी गझल मुशायरा, ही अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीने जपलेले वेगळेपण नेहमी उत्सुकतेचा विषय ठरत आलेलं आहे.
दिनांक २३  मार्च रोजी चतुर्थ  चरणात, ऑनलाईन शेतकरी कवी संमेलन, चंद्रपूर येथील येथील प्रसिद्ध कवी   आदरणीय प्रदीप देशमुख सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या सत्राचे बहारदार सूत्रसंचालन वर्धा येथील प्रसिद्ध कवयित्री प्राचार्या जयश्री कोटगीरवार यांनी केले. 
 
दिनांक २४ मार्च रोजी नियोजित वेळेत पाचव्या चरणात, होणारे सत्र सायंकाळी ७ वा. घ्यावे लागले. दिनांक २३ च्या रात्री संमेलनाचे मुख्य प्रक्षेपण स्थळ छोटी आर्वी येथे, वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने, वीज पुरवठा खंडीत झालेला होता. परिणामी संगणक, मोबाईल इत्यादी साधने विजेअभावी बंद पडल्याने नियोजित वेळेत सत्र सुरू करणे शक्य झाले नाही. म्हणजे येथेही निसर्गाने आपली करामत दाखविली होती. या अवकाळी परिस्थितीशी जुळवून घेत निसर्गाचा कौल स्वीकारत सत्र सायंकाळी ७.०० वाजता सुरू करावे लागले. ’शेतीसाहित्यातील बदलते प्रवाह’ या विषयाच्या अनुषंगाने आयोजित परिसंवादात, पहिले पुष्प गुंफताना, प्रा. डॉ. दिलीप बिरूटे सरानी, शेतीसाहित्यातील बदलते प्रवाह या विषयाची मांडणी करताना, साहित्य हा समाज जीवनाचा आरसा असल्याने त्याचे प्रतिबिंब साहित्यात पडणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. नांगर आणि नांगरी या दोन प्रमुख संस्कृती मधील अंतःप्रेरणांची ओळख करून देऊन मराठी साहित्यातील दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य, संत साहित्य, ग्रामीण साहित्य अश्या विविध प्रवाहाचा परिचय करून देताना त्यांच्या प्रेरणांची उगमस्थाने, या बाबत विस्तृत विवेचन केले, प्रत्येक प्रवाहाने साहित्याची उत्तमपणे हाताळणी केलेली असल्याचे सांगीतले. बिरूटे सरांनी विषयाच्या अनुषंगाने स्वातंत्र्यापूर्वी आणी स्वातंत्र्यानंतर  अशी  दोन भागात आपल्या एकूण विवेचनाची मांडणी केली. प्राचीन काळात अडीच हजार वर्षापूर्वी हाल निर्मित गाथासप्तशती मधून गाव शेती माती मानवी सहसंबधातून, शेती जाणिवा उद्धृत झालेल्या आहेच. पुढे महानुभाव संप्रदाय, संतसाहित्यातूनही तुकाराम महाराजाच्या रूपाने अभंगातून व्यक्त झालेल्या आहेच. मात्र शेतीनिष्ठ जाणिवा व्यक्त होताना महात्मा फुले यांच्या सारखी कणखर भूमिका त्यानंतर तेवढ्या तीव्रतेने घेतलेली दिसत नाही. असे निरीक्षण नोंदविले. १९०३ साली पीराजी पाटील या रामचंद्र टिकेकर यांच्या कादंबरीत दुष्काळाचे वास्तववादी चित्रण झाल्याचे दिसून येते. पुढे १९६० नंतर रा.र. बोराडे, ग.ल. ठोकळ, भास्कर चंदनशीव, डॉ. आनंद यादव, द.ता. भोसले यांनी ग्रामीण साहित्य चळवळीतून ग्राम जीवनाचे चित्रण उत्तम प्रकारे मांडले होते. १९८० च्या दशकात युगात्मा शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या आंदोलनाव्दारे शेतकऱ्यात आत्मभान जागृत केले. त्यांचे प्रतिबिंब साहित्यातही पडले. १९९० नंतर जागतिकीकरणाचे एकूणच समाज जीवनावर झालेल्या परिणामातून अनेक हातांना लिहिते केले. आसाराम लोमटे यांच्या 'आलोक' कथा संग्रहातून त्या जाणिवा नेमक्या व्यक्त झालेल्या आहे. शेतकरी चळवळीत युगात्मा शरद जोशीनंतर श्री गंगाधर मुटे यांचे लेखन अतिशय परखडपणे शेतीनिष्ठ वास्तवाचा वेध घेत राहिलेले आहे. आंतरजालीय माध्यमातून, मायबोली, मिसळपाव, बळीराजा डॉट कॉम, या सारख्या संकेतस्थळावर नव्या जाणिवेने लेखन झालेले आहे. त्यात श्री गंगाधर मुटे कार्यान्वित बळीराजा डॉट कॉम या संकेतस्थळाची भूमिका ही अनेक लिहित्या हातांना प्रेरणा स्रोत म्हणून महत्त्वाची भूमिका बजावताना दिसते. अगदी गेल्या सात संमेलनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विश्वस्तरीय लेखन स्पर्धेकरिता निवडण्यात आलेले विषय हा ही एक अभ्यासाचा जाणीव जागृतीचा भाग आहे.
 
परिसंवाद सत्रातील समारोपीय मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. ज्ञानदेव राऊत सरांनी सुरवातीलाच सातव्या नियोजित साहित्य संमेलनाचे स्थळ रावेरी, येथील सीतेचे वनवासातील वास्तव्य, भुमिकन्या म्हणून सीतेचे आध्यात्मिक स्थान, शेतकऱ्याचे भूमीशी असलेले  नाते  आणि योगायोगाने संमेलनाध्यक्ष वसुंधरा काशीकर यांचे वसुंधरा हे नावं, असा दुर्मिळ मध्यबिंदू साधुन, कोरोना अरिष्ट्यातही हे संमेलन व्हायलाच पाहिजे आणि ते यशस्वी करून दाखविल्याबद्दल संमेलनाचे कार्याध्यक्ष आ.गंगाधर मुटे यांच्या, गेल्या सात वर्षापासून शेतकरी साहित्य चळवळीला जनमानसात रुजविण्याकरिता करीत असलेल्या अथक कार्याचा यथोचित गौरव केला. पुढे बोलताना, युगात्मा शरद जोशी यांच्या अतिशय गाजलेल्या 'आम्ही लटिके ना बोलू' या लेखाचा दाखला देवून, साहित्यिकाकडून शेतकरी आंदोलनाला अपेक्षीत असलेल्या पाठिंब्याबद्दल काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्या म्हणजे साहित्यिकांनी शेतकऱ्याच्या जिभेने बोलले पाहीजे. फक्त मनोरंजनात्मक कलावादी दृष्टिकोनातून न लिहता, त्याचे दुख:, दैन्य, लूट यांची वस्तुनिष्ठपणे कारणमीमांसा आपल्या लेखनातून केली पाहीजे.
शेतीसाहित्यातील बदलल्या प्रवाहाचे सखोल विवेचन करताना महात्मा फुले यांच्या समग्र साहित्याचा आढावा घेवून, महात्मा फुलेंच्या प्रखर शेतीनिष्ठ जाणिवा त्यांच्या साहित्यातून उजागर झालेल्या आहे. पुढे हीच विचारधारा शेतकरी संघटनेची पायाभूत विचारधारा झाली. साठोत्तरी साहित्यात शेतीनिष्ठ जाणिवांची मांडणी वैयक्तिक कौटुंबिक पातळीवर झाल्याने ती चळवळीच्या अनुषंगाने फारशी उपयोगी पडलेली नव्हती. एकोणविसशे बाहत्तर साली पडलेला भीषण दुष्काळ व त्यानंतर पंचाहत्तर मध्ये झालेली हरीत क्रांती,ऐशीच्या दशकातला डंकेल प्रस्तावाचे शेतकरी संघटनेने केलेले स्वागत, परंतू तत्कालिक व्यवस्थेने प्रस्तावाच्या विरोधाला घातलेले खतपाणी आणी आज दिल्लीत सुरू असलेले शेतकऱ्याचे आंदोलन याची जातकुळी एक असल्याचे सांगून, जेव्हा शेतकऱ्याच्या भल्यासाठी दरवाजे उघडण्यात येतात तेव्हा दुसऱ्या बाजूने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने बंद करण्याचीही व्यवस्था कार्यान्वित होत राहते. तत्कालीन साहित्यिकांनी आपल्या वास्तववादी लेखनातून शेतीनिष्ठ जाणिवा उजागर केलेल्या आहेत.विषेशत: ग्रामीण साहित्यातून, भास्कर चंदनशिव यांच्या अंगारमाती ह्या संग्रहातील लाल चिखल, हिशोब यासारख्या कथांमधून बाजारी व्यवस्थेतील शेतकऱ्याच्या लुटीचे साकारण्यात आलेले प्रत्ययकारी वास्तव आजही बदलले नसल्याची खंत व्यक्त केली. शेषराव मोहीते, रा.र बोराडे, सदानंद देशमुख, मोहन पाटील, जगदिश कदम, विठ्ठल वाघ, भीमराव वाकचौरे, एश्वर्य पाटेकर, इंद्रजित भालेराव, सुधाकर गायधनी, कल्पना दुधाळ, केशव देशमुख, गंगाधर मुटे, संदीप जगताप, प्रकाश होळकर, आसाराम लोमटे, बालाजी सुतार, केशव देशमुख, लक्ष्मण महाडीक अश्या अनेक साहित्यिकांनी आपल्या कथा कविता कादंबरीतून शेतीनिष्ठा जाणिवा मांडलेल्या आहेत. आपापल्या परीने भिडण्याची भूमिका बजावलेली असून, जिथे गावात पोलिस वायरमन वसुली पथक आल्यावर शेतकरी लपून बसायचे त्याच शेतकऱ्यात खरे आत्मभान(भिडण्याची दृष्टी ) मात्र शेतकरी संघटनेच्या आंदोलनातूनच मिळालेली आहे.
 
दिनांक २५ मार्च रोजी सहाव्या चरणात, ऑनलाईन शेतकरी कवी संमेलन, पालघर येथील  प्रसिद्ध कवयित्री आ.अनुराधा धामोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या सत्राचे अत्यंत बहारदार असे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन प्रसिद्ध सुत्रसंचालक कवी लेखक अकोला येथील अनिकेत देशमुख यांनी केले.
दिनांक २६ मार्च रोजी सातव्या चरणात, ऑनलाईन समारोपीय सत्राच्या, सुरवातीस सन्माननीय अथिती, उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सतीश बोरूळकर सरांनी समारोपीय सत्राच्या ' आता भिडायचे, दडायचे नाही' या भूमिकेच्या अनुषंगाने, आपले मनोगत मांडताना ऐतिहासिक दाखले देवून, प्रतापराव गुर्जर, महात्मा गांधी आणि युगात्मा शरद जोशी यांच्या भिडणे या तत्त्वाच्या मुळाशी असलेल्या विचारधारेचे कालातीत महत्त्व विषाद करून वास्तवातील एकूणच सर्वच क्षेत्रातील भिडण्याच्या आड दडणाऱ्या तथाकथित मानवी प्रवृत्तीचा रोखठोक समाचार घेतला. अगदी  मनोगताची सुरवातच 'शेतकरी नेटकरी' अशी काव्यमय संवादातून करून शेवट ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव सराच्या कवितेतील "ते बुजगावण्याला घाबरत नाही" अश्या समर्पक कविता वाचनाने करून आपल्या मनोगतातून आता भिडण्याची गरज प्रतीपादीत केली.
दुसरे विशेष अतिथी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड. ललित बहाळे सरांनी समारोपीय सत्रात आपली भूमिका मांडताना, साहित्यिकाकडून काही अपेक्षा व्यक्त केल्यात. शेतकरी साहित्यात केवळ त्याच्या कष्टाचे, दू:खाचे, कलावादी, सौंदर्यवादी परीप्रेक्ष्यातून चित्रण झाल्याने ते साहित्य, शेतकऱ्याला कामगार म्हणून त्याचा संघर्ष उभा करण्यात खर्ची पडल्याचे दिसून येते. शेतकरी हा काही फक्त कामगार नाही, की तो फक्त दुसऱ्याच्या शेतात कामावर जातो म्हणून कामगार ठरत नाही. तो गुंतवणूकदारही आहे. आर्थिक शारीरिक मानसिक दृष्ट्या  गुंतवणूक करीत असतो. तेव्हा शेतकरी साहित्याची मांडणी करताना शेतीतील, अर्थशास्त्र. मानसशास्त्र, विज्ञान यांचा सारासार विचार करून वस्तुनिष्ठपणे मांडणी होणे आता काळाची गरज आहे. ह्या जबाबदारीचे भान साहित्यिकांनी ठेवणे आवश्यक आहे.
 
तिसरे प्रमुख अथिती ॲड. दिनेश शर्मा सरांनी आपल्या धारदार वाणीने आणी तेवढ्याच संयतपणे भिडणे या भूमिकेचा परामर्ष घेतांना, शेतीतील लुटीच्या सिद्धान्ताची कारणमीमांसा स्पष्ट करून, महात्मा गांधी, युगात्मा शरद जोशी यांच्या, भिडणे या भूमिकेला नैतिक अधिष्ठान होते असे सांगून, अन्यायाला विरोधाशिवाय, भिडण्याशिवाय त्यांना  दुसरा पर्याय मान्य नव्हता. थेट भिडणे ही एकच भूमिका घेतल्याने, शेतकरी आंदोलन जगभऱ्यात मान्य झाले. पाश्चात्त्य साहित्यातील साहित्यकृती व्दारे निर्माण झालेली सामाजिक जाणीव जागृती, शोषित आणि शोषकांनाही प्रेरणा देऊन गेली. असे साहित्य आपल्याकडे का निर्माण होत नाही? आपण असे काहीच लिहीत नाही, की ज्यामुळे सत्तेखालची जमीन हादरून जाईल. असे काहीच नव्याने निर्माण करीत नाही ज्यामुळे जगाचे काम थांबेल. आपली सर्व बुद्धिमत्ता परदेशी गहाण पडली असल्याने ती सर्वसामान्याच्या हिताचे काही करण्यास सिद्ध होत नाही. सिनेमातील नट हा कधीही थेट सरकारच्या विरुद्ध बोलत नाही. तो बोलतो, भांडतो समाजवादाने लादून दिलेल्या त्या चाकोरीबद्ध व्यवस्थेशी. ज्यातून मूळ प्रश्न कधीही ऐरणीवर येत नाही. होते फक्त तात्पुरती मलमपट्टी. अत्यंत मार्मिक प्रहाराने आपले समारोपीय मनोगतास विराम देताना अंतर्मुख केले.
 
समारोपीय सत्रात गत सहाही संमेनलनाच्या प्रथेप्रमाणे, विचार मंथनातून आपल्या मागण्या शासकीय दरबारी मांडण्याकरिता काही ठराव मांडण्यात येतात. या संमेलनात एकूण सात ठरावाचे वाचन संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री. गंगाधर मुटे सरांनी केले. उपस्थितांच्या सर्वसंमतीने सातही पारीत करण्यात आले आणि एका अतिशय आगळ्यावेगळ्या संमेलनाची सांगता झाली.
 
-  रवींद्र अंबादास दळवी, नाशिक
-------------------
 
Share

प्रतिक्रिया