
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*कथा*
*भाकर ... ते भाकर*
"आयेsss ये आयेsss कावून व आपल्या घरले दोनी संजले भाकर अजूक चून नाई त् भाकर अजूक वरनस रांन्ते वं ?"
प्रश्न पोराचा होता आणि तोही भाकरीवर होता, दोन संजले पोट भरणारी भाकर परंतु आज त्याचं भाकरीवर गुणवंतने आपल्या आईला प्रश्न केला... ह्या प्रश्नाचे सुशीला काहीच उत्तर देत नव्हती. काही काळासाठी सारं विश्व निरर्थक, भिकारी वाटत होत. काय सांगणार आई आपल्या लाडक्या एकुलता एका लेकराला. झोपडीवजा कुडाच्या घरात सायबनात पेटत्या चुलीच्या उजेडात सुध्दा तिला अंधाराचं जाणवत होता.
गुणवंता, त्याची आई सुशीला त्याचा बाप केशव आबू आडकू, आजी रखमाई असं एक दुःखी जास्त वजा सुखी असं कुटुंब चार-पाचशे लोकवस्तीच्या गावात वास्तव्याला होतं. घरात कमावता गण्याचा बाप आणि संसाराच्या गाड्याला तेवढ्याच ताकतीन ओढणारी गण्याची आई सुशीला आणि आबू आजी म्हातारे तरीपण जगण्याची उमीद आणि नातवाचे लाड पुरवण्यात त्यांनी कधीच कमी केली नाही.
दोन संजेच जेवण कसं बसं गुणवंताचा बाप गावातल्या पाटलाकडं सातकुडवाची चाकरी करून निभावून नेत होता. सुशीला पण पडेल ते कष्ट करून चार पैसे गाठीला पाडतं होती.
लगेच सुशीलाच्या कानावर ... पुन्हा एक ओळ पडली
" ताक् न कन्या ,,, खायरं गण्या "
" गण्याच्या घरात रांते दोन संज भाकर, कातं... गण्याचा बाप हाये मनून चाकर !" हे अर्धा चड्डीतल्या वर्ग सोबत्यायचे बोल, गण्या आपल्या मायेले सांगत होता
हे गण्या लेकराचे बोल ऐकून मायेले बोलावसं लागल,
" व्हय ....आपन चाकरस हाय ह्या गावच्या पाटलाच्या दारीचे, वावराचे, घराचे. त्यायनं देलेल्या जवारीच्या पिठापासून आपल्याले भाकर भेट्टे लेकरा तवा आपण चाकरस हाओ "
"गरिबानं करावी चाकरी, अन् खावी इमानानं पोटाची भाकरी ." अना या चाकरीतून येनाऱ्या दिसामंदी तुले जं रोटी अना भाजी खावाची असनं तं तुले सिकालं पायजे लेकरा...!"
लहानसं गुणवंता आपल्या आईचे या दिवशीचे शब्द न शब्द आपल्या इवल्या मनात कोरत होता. असं वाटतं होत, आज पर्यंत चार वर्ग शिकलेल्या ज्ञाना पेक्षा आईचं ज्ञान अंतर्मुख करतं होत.
" निऱ्या, भाकरी पासून, तुले आमाले अना तुले जर अलक करावाचा असनं तं तुले जीवनामंदी काईतरी कराचा हाये..." पुन्हा सुशीला गुणवंताला समजावून, चुलीवर भाकऱ्या भाजण्यात मग्न होती.
महिन्याच्या आखरीले मिळणाऱ्या सातकुड दाण्यातून आणिक शेर पसा कटानातून केशव आपला परिवार , दोन संजले चटणी भाकर खाऊन चालला होता.
गुणवंताच्या मनात भाकरीची आवड होती, पोटाच्या भुकेला भाकरीची आवड होती पण ताटात रोज भाकरचं आणि बाकी पोराच्या ताटात रोज, रोटी भाजी वरण-भात हा भेद मात्र गुणवंताच्या लक्षात नक्कीच आला होता. या मागचं कारण शोधण्यात गुणवंता लागला होता.
गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असताना गुणवंता शिक्षणासोबतच व्यवहारी ज्ञान सुद्धा आले होते, तेव्हाच तो या भाकरीच्या प्रश्नावर विचार मग्न होता. भाकरीवर प्रेम करत होता, पण तेवढ्याच उत्कंठेने या विषमतेची चीड पण येत होती.
केशव आणि सुशीलाच झोपडी वजा कुडा भितींच एक दरवाजा एक कोनाडा, खिडकी व अंगणातच सायबन काढून एका कोपऱ्यात मातीची चूल असलेल घर पांच पोटाच कुटुंब कसं बसं काबाडकष्ट करून दिवस कलते करतं होतं.
कधीही कानावर नाही आलेलं नातवाचं आजचं बोलणं आबू- आजीनं ऐकलं होतं. आपण आपले नं पोराचं जीवन सात कुडवाची चाकरी करून काढलं, पण काळानुसार बदल पाहून आपल्या नातवाच्या वाट्याला हे काही तरी नवीन दिवस यावे हे गुणवंताच्या अख्ख्या घराले वाटत होत.
रात्रीचं.. भाकर कण्या वरण जेवण झाल्यावर... आडकू आपल्या लेकराले बोललाचं
"अयकलां का केसवा, तुवा पोऱ्या भाकरीत बदल पायतो मंते लेका..."
"मंजे... " केशव बोलला
"आरं या जराकस्या सुदरलेल्या येरी बी , निरी रोजरोज भाकर खाऊन तरासलं पोर."
"मंग का करू बा म्या, मालकाले चार पायल्या गवू, तांदूर मांगितलन् तं मयन्याची अर्दी जवारी कापून घेईन मंते. कसं बसं कटान भेट्टे ते बी"
"आरं ,,,रामा,, नाई परवडे केसवा आपल्याले हे असं " आडकू बा उत्तरला
या दोघांच्या बोलण्याकडे रखमाईच लक्ष होतंच. या पेक्षाही कठीण प्रसंग तिने केशव ला पोसण्यात, सात कुडव्यातरी बनविण्यासाठी पाहिले होते, यात काय बोलणार बिचारी, पण तिला मनोमन वाटतं होतं की, तिच्या एकुलत्या एका नातवाच्या वाट्याला, लेकाच्या वाट्याला आलेले ते उपासमारीचे दिवसं येऊ नये. गुणवंतान शिकावं आणि आपल्या रोजच्या जेवणात काहीतरी बदल करावा.
सुशीलेनं मिळेल ते कष्ट करून जमा केलेले चार पैसे तिच्या संसारात कामी येत होते. कवा कवा का होईना ते आपल्या पोराले व कुटुंबाले पोळी-भाजी वरण-भात काही गोडधोड रांदून घालण्याचा बेत करतसं होती.
गाव गाड्यात खेड्यापाड्यात त्यावेळेस दहा-विस गावां मिळून एका मुख्य गावात आठवडी बाजार भरत असायचा. मीठ मिरची, लसूण, कांदा भाजीपाला व इतर जीवनावश्य वस्तू घेण्यासाठी त्या परिसरातील लोक आठवडी बाजारात जात होते, त्याचप्रमाणे गुणवंताची आई, आपल्या मुलाला व्यवहारी ज्ञान यावं आणि भविष्यात त्यानं काहीतरी जीवनात करावं यासाठी आठवडी बाजारात घेऊन जात होती. तशी घरची परिस्थिती गरीबच तरीपण रोजी रोटी करून हातात येणारा पैसा आपल्या कमरेला खोसून गण्याची आई व गण्या चार मैल दूर पैदल आठवडी बाजार करण्यासाठी जात होती. बाजार करत असताना त्याची आई बाजार करत होती आणि गुणवंताच लक्ष मात्र त्या बाजारात चाललेल्या व्यवहाराकडे होते.
आठवडी बाजाराचे दृश्य गुणवंताला आकर्षित करत होते. मधोमध पण व्यवस्थित एका लाईन मध्ये लागलेले प्रत्येक जीवनावश्यक वस्तू चे दुकानं गुणवंता उत्सुकतेने बघत होता. भाजीपाला, कपडे, खाजे- खुस्कुले, मास, मच्छी, मटन मसाला यांचे दुकान तसेच एका लाईन मध्ये जुन्या काळात तागाच्या पोत्यात किंवा बारीक कामट्यायच्या मोठ्ठ्या टोपल्यात शिग भरून धान्याचे दुकान बाजारात लागलेले असायचे. बाजार करताना किमान तीन साडेतीन फुटाचा गुणवंता आपल्या आईच्या मागे मागे अनवाणी पायाने चालत होता. अंगात कसे बसे पकडे, पायात चपलेचा पत्ता नाही त्याही परिस्थितीत गुणवंता आपल्या आईला सामान घेण्यासाठी मदत करत होता. खाकेमध्ये एक मळकट पिशवी घेऊन त्यात आईने घेतले ते सामान भरून तो, आपल्या जीवनाचं सार्थकचं जणू काही त्या पिशवीत जमा करत होता. सर्व काही खरेदी झाल्यानंतर त्याची आई त्याला एका धान्याच्या दुकानात घेऊन गेली. तिच्याही मनात आलं असावं आपल्या पोरांना दररोज तर नाही परंतु पंधरा दिवसातून महिन्यातून गव्हाची रोटी व काहीतरी भाजी - भात त्याच्या ताटात यावा या उद्देशाने गुणवंताचा परिवार म्हणजेच आई आणि वडील विचार करून बाजारातून गहू व तांदूळ घेऊन आपल्या पोराला पोटभर नाही पण याची ओळख म्हणून काहीतरी खाऊ घालावं या उद्देशाने गण्याच्या आईने बाजारातून गहू व तांदूळ आणण्यासाठी उसणवाडी काटकसर करून चार पैसे जमा केलेल्यातून तिने दोन पायल्या गहू व एक पायली तांदूळ खरेदी केले व घरून आणलेल्या लुगड्याच्या कपड्यांमध्ये दोन पोतल्या बांधल्या.
हा सर्व नगदी व्यवहार करत असताना गुणवंताच लक्ष मात्र त्या चुंगडीत भरलेल्या धान्यावर खोसलेल्या रकमेच्या लहान लहान पाट्याकडे लागलं होत. ज्या भाकरीसाठी गुणवंता आईला बोलत होता त्या भाकरीला लागणाऱ्या ज्वारीची किंमत त्यावेळेस १ रुपया २० पैसे एवढी ठरली होती, त्याचबरोबर गव्हाची किंमत ३ रुपये ३५ पैसे, तांदळाची किंमत ४ रुपये ५० पैसे, तुवर दाळ ६.०० रुपये, तसेच इतर काही खाण्याचा वस्तू गाण्याच्या खरेदीच्या पलीकडे होत्या, असे इतरही धान्य त्या दुकानात उपलब्ध होते पण ऐपत तेवढी खरेदी म्हणून गुणवंताच्या आईने फक्त दोन पहिल्या गहू व एक पायरी तांदूळ खरेदी करून घराकडे आपला रस्ता धरला. या आठवडी बाजाराच्या व्यवहारात गुणवंता बरेच काही शिकला होता.
घरी आल्या आल्या सुशीलेन कसलाही विलंब न लावता गावातिल चक्कीवरून गहू लावून आणले. आपल्या पोराले व घरच्यायले आज पोळी भाजी खाऊ घालण्याची तिला जणू घाई झाली होती, त्यातचं ती आज धन्यता मानत असावी.
घरचे समदे जेवनाच ताट घेऊन बसले असता, सुशीलेच सुग्रास जेवण ताटात पोळी भाजी, भात बघताच सगळ्यांच्या नजरा सुशीला कडे वळल्या.
" आयेsss रोटीsss"
म्हणत गुणवंता भरल्या ताटावरून आनंदाने उसळला व रोटी भाजी... रोटी भाजी म्हणत आनंदून गेला.
गण्याच्या घराचा त्या रात्रीचा आनंदी क्षण अनुभवण्या जोगा होता. आणि अशाच भरल्या ताटासाठी ४ थ्या वर्गात गुणवंतला पडलेला भाकरीचा प्रश्न हा, उच्च शिक्षण घेऊनच सुटणार होता हे सर्वांना माहीत होत. आणि त्या वाटेने तसा गुणवंताचा प्रवास सुरू झाला.
भाकरी बदलण्याचा प्रयत्न करणारा गुणवंता अतिशय कुशाग्र बुद्धीचा असणारचं त्यात काही शंकाच नव्हती. अर्ध्या भाकरीवरून भरलेल्या ताटाकडे जाण्यासाठी जे कष्ट करावे लागेल ते कष्ट करायला गुणवंता घरचे तयार झाले. तसा गुणवंता पण आपल्या शिक्षण चातुर्याने एक एक वळण पार करत राहिला... गावात फक्त ४ वर्ग... पण ५ वी १० शिक्षणाचा रोजचा दोन अडीच कोसाचा प्रवास तो,,, समोरील जीवनाचा प्रवास सुखकर होईल म्हणून न थकता पार करत होता. या प्रवासात त्याला ठोकराही भरपूर लागल्या होत्या. परंतु फुटलेल्या बोटांचा विचार न करता तो चालत राहिला. पुढे चालत असताना त्याच्या तळव्याला वं बोटाला चपलेचा आधार कधी आला हे गण्याला सुद्धा कळले नाही. प्राथमिक ,माध्यमिक, उच्च माध्यमिक, डिग्री... असा अनवाणी पायाने सुरू झालेला गुणवंताचा प्रवास चपले पर्यंत आला होता. अजूनही भाकर ते पुर्ण ताटाचा प्रवास त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. मात्र खडतर प्रवास व उच्च शिक्षणाने गण्याचा गुणवंत होण्याचे प्रामाणिक प्रयत्न हळूहळू गुणवंताला यशाचा वाटसरू बनवत होते. गुणवंता जेवढा शिक्षणात कुशाग्र बुद्धीचा होता तेवढाच तो प्रामाणिक चिकाटी आणि धैर्यशील होता. आपल्या परिस्थितीची जाणीव मनामध्ये ठेवून तो यशस्वीतेच्या मार्गाकडे चालण्यासाठी वेळप्रसंगी कुणाचीही मदत घेण्यास तत्परतेने हजर राहायचा. शिक्षण घेत असतानाच त्याने सामान्य ज्ञान व सामाजिकता या विषयाची कास धरून असे काही गावातील व त्याच्या शालेय शिक्षणात ते कॉलेज शिक्षणात असे काही प्रश्न निर्माण केले होते की त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तो शोधण्यासाठी वेळप्रसंगी कुणाचेही पडेल ते काम करायला तयार झाला आणि त्यातूनच त्याला एक मोठं स्वप्न साकार करण्याची जिद्द मनात लागली. त्या अनुषंगाने गुणवंताचे प्रयत्न सुद्धा फळाला येत होते. लहानपणीचे त्याचे प्रयत्नवादी प्रयत्न आई सुशीला आणि वडील केशव यांचे अतोनात काबाडकष्ट, समाजातून होणारे काहीसे दुर्लक्ष व मदत सुद्धा त्याचे जीवन उज्वल करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा वाटा गुणवंताला भेटला होता आणि त्यातच त्याने हळूहळू आपले शैक्षणिक आणि सामाजिक चातुर्य दाखवायला सुरुवात केली. लहानपणापासून जीवनाच्या कितीतरी कठीण परीक्षे पासून, शैक्षणिक परीक्षा गुणवंता गुणवत्ता यादीत पास झाला होता. आणि घडविलेल्या जीवनाला आकार देणारी म्हणजेच शासन दरबारी एक मोठ्या पदाची परीक्षा देण्यास गुणवंत सज्ज होताचं. आत्मीयतेची आग, भाकरीच्या प्रश्नातून भाकरी पर्यंत नेणाऱ्या भाकरीची जाणीव सोडविणारे कठीणातिल कठीण गुणवंताने सोडविले होते त्या प्रश्नांपुढे, परिक्षेत येणारे कितीही कठीण प्रश्न त्याला प्रश्न वाटत नव्हते. सगळ्यात मोठा भाकरीचा प्रश्न सोडवणारा गुणवंता कठीणातिल कठीण प्रश्न सोडवण्यात तत्पर होता आणि ते त्याने करून दाखविले. कौटुंबिक जीवनमान बदलवून टाकणारी आय.ए.एस. ची परीक्षा एका झटक्यात पास झाला.
त्याचा झोपडीवजा घरच्या मिनमिनत्या दिव्यातला, कंदिलातल्या प्रकाशातील प्रवास हा कधी लाल दिव्याच्या गाडीपर्यंत आला हे त्याचे त्यालाही कळले नाही. सरकारी लाल दिव्याची गाडी व एक भलं मोठ्ठं सरकारी घर त्याच्या नावाच्या पाटीने सजले, हे काळाच्या प्रवाहात सत्य होत.
याच काळामध्ये गण्याच्या घरात काहीशा दुःखद घटना सुद्धा घडल्या होत्या त्या दुःखद घटनेतून सावरत गण्याने आपला प्रवास सुरूच ठेवला आणि तो प्रवास अगदी शेवटच्या उंबऱ्यापर्यंत नक्कीच आला होता. जवळपास १६ वर्षाच्या खडतर प्रवासानंतर गण्याचा गुणवंत होण्यासाठी त्याच्या कुटुंबाने केलेल्या कष्टाचं फळ स्वरूप गाण्याच्या रूपात आई सुशीला व केशव यांना दिसत होत. या सुखासाठी गण्याचा लाड करणारे आजा आजी मात्र त्याच्या या आनंदी सुखाला साक्षी नव्हते.
" गुणवंत केशव झुंजकर " या कलेक्टर नावाची ओळख संपूर्ण राज्याला असून सुद्धा, गुणवंत आपल्या गावाला, गावातील झोपडीवजा कुडाच्या घराला, सायबनातील चुलीला, सात कुड ज्वारी देण्याऱ्या मालकाला, सवंगडी आणि आपल्या कष्टाळू माय बापाला कधीच विसरणार नव्हता. तसेच हा सर्व बदल घडवताना गुणवंत, भाकरीचा बदलता प्रवास कधीच विसरला नाही. तो आजही आपल्या भल्या मोठ्या घरात कधी मोठ्ठ्या हॉटेलमध्ये, आई - वडीला सोबत
आत्ता सुद्धा कधी कधी आवडीने भाकर आणि झणझणीत भरीत खातचं असतो.
"आयेsss ये आयेsss चाल वं बाप तू मी अन्,, आ... "
मधेच गुणवंत बोलता बोलता अडकला, त्यांच्या आबू आजीच्या स्मृती अजूनही त्यांच्या मनात होत्या.
आये... आबू - आजी पायजे होते वं अज.! " असे म्हणत गुणवंतचे डोळे नेहमीच पानावत होते.
आबू - आजी नसल्याचं दुःख पचवून तो आपल्या आईला कधी कधी अलिशान किचन मध्ये भाकरी चून करायला लावायचाचं तर कधी,
"चला आज आपण... हॉटेलमध्ये जाऊन मस्त पैकी भाकर आणि मस्त भरीताचा बेत करुया!" असे म्हणत,, आपल्या माय बापा सोबत जेवायला जातं होता.
उच्चभ्रू हॉटेलमध्ये भाकरीचे जेवण जेवताना तो आपल्या आयेला म्हणायचा "भाकरी हाये पर आये, तुया हातची चव या भाकरीत नाई वं "
"मंग कहाले आनतं येतं, घरीस थापून वाढते म्या बापू तुले !" सुशीला बोलायची
बाप मात्र या माय लेकाकडं बापाच्या नजरेने बघत असायचा. त्याच्या सातकुड दाण्यातून दोघांचं भाकर प्रेम त्याला माहित होते.
" नाई .. आये ,, म्या जानून येतो, माई मायगलेली भाकर खावालं " गुणवंत आपल्या आईला भाकरीच बदलत रूप समजावून सांगण्याचा विचाराने बोलतं होता.
एके काळी काहीसा, भाकरीचा तिरस्कार करणारा गुणवंत आज भाकरीवर अभिमानाने बोलत होता. मोठं मोठ्या हॉटेल मध्ये भाकरीचा सन्मान पाहून तो सुखावत होता. त्याची भाकर आज पंगतीची शान झाली होती. महागड्या खाण्यात भाकरीला मान मिळताना पाहून गुणवंत सुखावत होता. खुल्या बाजारात सर्वात कमी किमतीत मिळणारी भाकरीची ज्वारी आज पॉकेट बंद होऊन मोठ-मोठ्या मॉलमध्ये विराजमान झाली होती.
माय - बाप, आबू - आजी यांच्यासोबत चून भाकर, ताक कण्या खाणारा गण्या,, आज मोठ्या हॉटेल रेस्टॉरंट भाकर ते... भाकर हा बदल अभिमानाने बघत होता. आठवडी बाजार ते मॉल मध्ये जाण्याचा त्याचा प्रवास कितीतरी कठीण होता हे गुणवंतच्या कुटुंबालाच माहित, पण आज गण्याचा गुणवंत पाहून त्या गावातील त्याच्या काळातील असलेले त्याचे सवंगडी आणि गावातील गण्याच्या परिस्थितीला साक्षीदार असे लोक आजही आहेत आणि गण्याचा गुणवंत होण्याचा गौरव ते करतात. त्याच्या प्रत्येक शब्दातून त्यांच्या बोलण्यातून गावातील लोकांच्या सांगण्यातून गण्याचा गुणवंत कसा झाला याचे साक्षीदार अजूनही त्याच्या गावात आहेत. खरंच गण्याचा गुणवंत होण्याचा इतिहास फार मोठा आहे त्यामागे कष्ट आणि बरेच काही.
आजच्या घडीला ... हॉटेल रेस्टॉरंट मध्ये जाऊन पूर्ण मसालेदार ताटभर जेवणारा गुणवंत आज,'भाकर आणि मस्त वांग्याच्या भरीताचा बेत करूया म्हणतो ते असेच नसेल.' कारण भाकरीचा इतिहास गण्याने चांगलाच अनुभवला होता एकेकाळी रोज ताटात भाकरी पाहून रुसणारा, रडणारा, नाराज होणारा गण्या आज मोठाल्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन भाकर आणि चुन किंवा वांग्याच्या भरीताची मागणी करतो, तेव्हा हा भाकरीचा काळ किती बदलला असेल हे त्याचे त्यालाच ठाऊक. कसा आणि किती बदलला असेल हे ही त्याचे त्यालाच ठाऊक. शेतात पिकणाऱ्या ज्वारीच्या पिठापासून तयार होणारी भाकर तो अजूनही विसरला नाही. त्याला कारणही तसेच होते धनदौलत वैभव, पैसा-पाणी, गाडी बंगला सगळं आलं पण गण्याच्या रक्तात भिनलेली भाकर तो कधीही विसरला नाही. आठवडी बाजारात १ रुपया २० पैसे पायलीने मिळणारी ज्वारी आज मॉलमध्ये ८० रुपये किलो या भावाने मिळते, हे पाहून गुणवंतला धन्यता वाटते, आणि त्याच्या मनात एकच विचार असतो की माझ्या भाकरीला चांगले सुगीचे दिवस आले आहेत. ३५ ते ४० रुपये मिळणारा गहू , ५० ते ६० रुपये मिळणारा तांदूळ,, त्याहीपेक्षा त्याच्या भाकरीची किंमत जास्त मिळते तेव्हा त्याला त्याच्या वडीलाला मिळत असलेल्या सातकुड ज्वारीची किंमत कळते. आणि आज वडिलांच्या कष्टाने कमाविलेल्या पायली-पसा ज्वारी ला अंतःकरणातून नमन करतो. स्वतः पेक्षाही तो ज्वारीचा सन्मान व तिचे बदलते वैभव पाहून आनंदतो. आणि सहजच गुणवंतच्या अनुभवातून शब्द निघतात... ते असे
ताटात वाढलेली मज भाकरी म्हणाली
चव घ्यायची तुला तर चल वावरी म्हणाली
✍️
सुनिल बावणे - निल
वायगांव (तु.) भद्रावती
८३०८३३४१२३