Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



इंडिया विरुद्ध भारत आणि त्यात गाडल्या जाणारा बळीराजा

लेखनविभाग: 
वैचारिक लेख
इंडिया विरुद्ध भारत आणि त्यात गाडल्या जाणारा बळीराजा....
 
देव दानव किंवा दैत्य यांच्या वंशावळीचा अभ्यास केला असता मरीची ऋषीपासून कश्यप-अदिती, कश्यप-दिती, कश्यप-दनू असे तीन पुत्र जन्माला आले. त्यानंतर पुढे वंशावळ वाढून कश्यप-आदितीपासून देव जमात तर कश्यप-दितीपासून दैत्य वंशावळीची निर्मिती झाली. पुढे यातूनच हिरण्यकशिपू व हिरण्याक्ष असे महापराक्रमी दैत्य जन्माला आले . पृथ्वीला त्यांनी त्राहीमाम करून सोडले होते असे मिथक आहे. पुढे हिरण्याक्षचा मुलगा अंधक तर हिरण्यकशपूपासून भक्त प्रल्हाद हा पुत्र तर भक्त प्रल्हादाचा मुलगा विरोचन आणि विरोचनाचा पुत्र दानशूर, उदार, क्षमाशील बळी त्याच बळीचा पुत्र बाणासुर आणि बाणासुराचा पुत्र वज्रज्वाला-कुंभकर्ण अशी ही संपूर्ण वंशावळ आहे. ही वंशावळ इथे देण्याचे कारण आहे, बळीराजा.
 
"इडा पिडा टळो ! बळीचे राज्य येवो"बळी म्हणजे कोण तर सात काळजांच्या आत जपून ठेवावा, असा निरागस 'माणूस'! आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला कष्टाचे व हक्काचे फळ सम प्रमाणात विभागून देणारा संविभागी नेता!!
बळी-हिरण्यकश्यपूचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व ! सुमारे साडेतीन ते पाच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या भारतीय बहुजनसमाजाचा महानायक, एक महासम्राट, एक महान तत्त्ववेत्ता! असा संदर्भ बळीवंश या कादंबरीत संस्कृतचे गाढे अभ्यासक व ज्येष्ठ इतिहास संशोधक लेखक डॉ. आ. ह. साळुंखे देतात.
 
पौराणिक कथामध्ये भगवान विष्णूने बटूक रूपात वामन अवतार धारण करून बळीकडून तीन पद जमीनीचे दान मागितले . वामनाचा हा कपटीपणा कावेबाजपणा गुरू शुक्राचार्यांनी पदोपदी लक्षात आणून दिला. परंतु गुरूवचनाचा बळीराजावर काहीच फरक पडला नाही. बटूक वेशातील विष्णुला त्याने ओळखूनही आपल्या वचनापासून व दानशूरपणापासून तो तिळमात्र ढळला नाही. वचनाप्रमाणे दान देण्यास पुढे सरसावला. विष्णूने दोन पदांमध्ये स्वर्ग व पृथ्वी घेतल्यानंतर तिसरा पाय कुठे ठेवावा हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी दानशूर बळीराजांनी आपले मस्तक त्यांच्यापुढे ठेवले. आणि वामनाने बळीच्या पुस्तकावर पाय ठेवून त्याला पाताळात धाडले. त्याची वचननिष्ठा पाहून व दानातून उतराई होत विष्णुने बळीराजाला सुतल समृध्द प्रदेशाचा राजा बनवले. व स्वत: विष्णू बळीच्या या सुतल राज्याचा व्दारपाल बनला व भाऊबीजेला भाऊ म्हणून लक्ष्मीने बळीस ओवाळल्यावर विष्णूची सुटका केली. तर अशी आख्यायिका आहे.
 
याचीच सांगड घालत महात्मा फुलेंनी त्यांच्या 'गुलामगिरी' या ग्रंथात वामनाने बळीराजाचं राज्य कसंं हिसकावल? याच वर्णन केले आहे.
 
गुलामगिरी पुस्तकामध्ये संवादरूपी वर्णन केले आहे. एक माणूस इतका मोठा कसा होऊ शकतो की एक पाय ठेवल्याबरोबर पृथ्वी व्यापेल अन दुसरा पाय स्वर्गात ठेवतांना ढगाचेही वर गेला असेल. एवढी उंची गाठतांना स्ट्रेचिंग करताना त्याची फाटली नसेल का ?असा प्रश्नही मिश्किलपणे उपस्थित करतात .पृथ्वीवरच्या बळीला तिसरा पाय कुठे ठेवू हे स्वर्गातून बोलणा-या वामनास कसे ऐकू आले असेल असा लॉजिकल टेस्ट स्वरूपात प्रश्नही करतात .हे सर्व कटकारस्थान फक्त बळीची बदनामी करण्यासाठी रचल्या गेले असा आरोप करून अशा पौराणिक कथा निर्माण केल्या गेल्या असे ते म्हणतात.तसेच
जेत्यांनी पराभूतांचा इतिहास नाकारण्यासाठी हे मिथक रचलेले आहे असे महात्मा फुले ठामपणे म्हणतात .
 
आधुनिक भारताच्या इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिला. त्यात बळीराजाला आद्य स्थान दिले आहे.तर छत्रपती शिवाजी महाराज हे बळी वंशातील आहेत असे ते वर्णन देखील आहे. " इडा पिडा टळो ,बळीचे राज्य येवो!" असे माय बहिणी ,कष्टकरी ,बहुजन यांना का वाटते याचे कारण एकच आहे की बळीराज्य हे लोककल्याणकारी असावे म्हणूनच इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो असे म्हटले जात असावे. बळीराजाचे राज्य हे पाताळात होते. म्हणजेच भौगोलिक दृष्ट्या विचार केला असता स्वर्ग हा तिबेट भागात वसलेला तर पृथ्वी म्हणजे संपूर्ण विस्तिर्ण पसरलेला उत्तरेकडील भारतीय खंड तर पाताळ म्हणजे बळीराजाने व्यापलेला दक्षिणेकडील समृध्द प्रदेश! तर या समृद्ध प्रदेशातील बळीराजाने राज्य रक्षणासाठी बहिरोबा ,खंडोबा असे स्वामी विविध भागात नेमलेले होते . महाराष्ट्रापासून त्याच्या राज्याचा विस्तार होत कर्नाटकातील महाबलीपुरम तसेच केरळ पर्यंत वाढत गेला. म्हणूनच की काय केरळमधील ओणम महोत्सव बळीराजाप्रती समर्पित आहे. ओणम सणाच्या दिवशी प्रत्यक्ष बळीराजा आपल्या प्रजेची खुशाली बघण्यासाठी येतो असे केरळवासी मानतात. म्हणूनच हे मल्याळी लोक नटूनथटून हा सण साजरा करतात आणि आपले दु:ख बळीला दिसू देत नाही अशी आख्यायिका आहे.
 
यावर महात्मा फुले म्हणतात की, डोक्यावर तिसरी लाथ ठेवणे म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादावर लाथ मारण्यासारखी होय. कथांच्या आड शेतक-याने कर्मकांडाला स्विकारून ज्ञानाची कवाडे बंद करण्यासारखे होय. ही सर्वसामान्य बहुजनांवर मारलेली लाथ होय.
तर क्रांतीकारी संत म्हणून ज्यांचे नाव घेतल्या जाते असे जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, "हे हरी, ज्याने तुला दान दिले, उपकार केले त्या उपकारकर्त्या बळीराजा तू सोडले नाहीस त्याला पाताळात घातलेस! किती तू निष्ठूर आहेस?" अशा तीव्र शब्दात ते निषेध व्यक्त करतात. क्रांतिकारी प्रहार करतात.ते पुढीलप्रमाणे
 
"हरी तू हरी तू निटूर निर्गुण |
नाही माया बहु कठीण ||
नभी ते करसी आन |
कनवे नाही केले ते||
बळी सर्वस्वी उदार ज्याने उभारीला कर |
करुनी कहर तो तू पाताळी घातला ||"
 
संत कबीर वामनाला देव मानत नाहीत . याउलट ते म्हणतात "वामन होई नाही बली छलिया|"
म्हणजे वामनाने छल कपट करून बळीचे राज्य हिसकावले असे संत कबीर म्हणतात . वामन ईश्वराचा अवतार नाही.
बळीला पाताळात घातले तरीसुद्धा बळीचे राज्य येवो असे बलिप्रतिपदेला आपण का म्हणतो ?तर बळीचे राज्य समृद्धीचे प्रतिक होते हे त्रिवार सत्य होते हे यावरून लक्षात येते.
 
वामनाच्या धूर्तपणाबद्दल युगात्मा शरद जोशींनी नवे अवतार आजच्या जनतेपुढे १९८२पासून मांडले आहेत.
सगळे बळीराजे पुराणातल्या वामनावरच तुटून पडू लागले.पंरतु दसऱ्याला रावणाच्या, दिवाळीला नरकासुराच्या लाकडी, कापडी, कागदी पुतळ्यांचं दहन करून आपण स्वत:ला शूर समजतो पण आजूबाजूचा रावण आणि नरकासुरांना विरोध करणे कुणालाही का जमत नाही? ही वस्तुस्थिती आहे.
मूळ संविधानात घटनेत विष्णूने धूर्तपणे बळीचे जमिनीचे अधिकार काढून घेतले व घटनेत नसलेले परिशिष्ट ९ घालून सरकारनेही शेतकऱ्यांचे जमिनीवरचे सर्व मुलभूत अधिकार काढून घेतले .
विष्णू बळीच्या तथाकथित दरबारात द्वारपाल आहे. पण बळीच्या सगळ्या कार्यक्रमांवर कारभारावर विष्णूचेच लक्ष आहे, विष्णूचेच निर्बंध आहेत. आजही शेतमालाच्या खरेदी विक्रीवर आयात-निर्यातीवर सरकारी नियमच लागू आहेत. सरकारही अन्नदाता, पोशिंदा म्हणून शेतकऱ्यांचे कौतुक करते आहे. विष्णूने बळीला राज्यातून विस्थापित केले. स्वत:च्या अधिकारात असलेल्या सुतल प्रदेशात पाठवले आहे. पण कृषीअर्थव्यवस्था, कृषीधोरण त्याला न्याय देऊ शकले नाही.ते कुचकामी ठरले आहे ही वर्तमानातील शोकांतिका आहे.
 
वस्तुस्थितीची जाणीव करून देणारे, रोखठोक बोलणा-यांना झारीचे शुक्राचार्य अशा गोंडस नावाने हिणवल्या जाते .शेतमाल,कर्जबाजारीपणामुळे बळी लुटल्या जात आहे,नागवल्या जात आहे हे आपण फक्त उघड्या डोळ्याने बघतो आहोत.
 
अशा आपल्या महान बळीराजाचा वामनाने कपटाने घात केला. तीन पावले भूमी म्हणजे स्वर्ग, भूमी, पाताळ व्यापणे नव्हे ती तीन पावले भूमीचा अर्थ यज्ञ, वेद आणि वाणी यांना परवानगी देणे असा होतो.
अशा आपल्या पराक्रमी राजाला कपटाने मारुन त्याचा इतिहास विकृत केल्या गेला. आमच्या बहुजन समाजापासून तोडण्याचा प्रयत्न केला पण आज बळीराजा जीवंत आहे. 'इडा पिडा टळो! बळीचे राज्य येवो' असे म्हणून आपण त्यांचे हजारो वर्षांपासून स्मरण आजही करतो. अशा आपल्या महापराक्रमी सर्वगुणसंपन्न, समतावादी राजाची दिवाळीत घराघरामध्ये पूजा व्हावी आणि आपली मूळ संस्कृती उजळावी ही इच्छा.
 
बुडती हे जन| देखवेना डोळा||येतो कळवळा म्हणूनीया
या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांविषयी सरकारचे विविध अन्यायपूर्वक धोरण बघून कुणाचीही मन अस्वस्थ होणार असे चित्र दिसते आहे.
भारतातील ७० टक्के लोकांचा प्राथमिक व्यवसाय शेती असून भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेतक-यास संबोधले जाते.
मानवाने बी पेरून धान्याचे उत्पादन करायला सुरुवात केली. आणि तेव्हापासून ख-या पारंपारिक शेतीची सुरुवात झाली. जंगलात जाऊन फळे ,पाने, फुले आणि मुळ्या गोळा करणे आणि पोट भरणे एवढ्यापुरती ती मर्यादित होती.
 
भारतामध्ये केवळ शेतीवर लक्षावधी शेतकरी बांधवांचे जीवन अवलंबून आहे . निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतक-यास वारंवार करावा लागतो. हे न संपणारे कालचक्र तसेच सरकारची ध्येयधोरणे,बी बियाणे,खते यांच्या वाढलेल्या भरमसाठ किंमतीलाही सामोरे जावे लागते अशा या दृष्टचक्रात त्याचे मरण झाल्याशिवाय राहत नाही.
 
शेती समृद्ध करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे आणि त्यायोगे औद्योगिक सामर्थ्य वाढवल्याशिवाय तरणोपाय नाही.
करीता दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन,मधुमक्षीकापालन,
रेशीमउद्योग,शहामृग व कुक्कुटपालन या शेतीपुरक जोडधंद्याची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे.
 
महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड' या पुस्तकाच्या सुरूवातीलाच शेतकऱ्याच्या परिस्थितीचं अगदी चपखल वर्णन पुढील शब्दांमध्ये केले आहे-
 
विद्येविना मती गेली,
मतीविना नीति गेली,
नीतीविना गती गेली,
गतीविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले,
इतके अनर्थ एका अविद्येने केले.
 
महात्मा फुले यांनी स्पष्टपणे सांगितलं की- "कष्टकरी शेतकरी जो कर भरतात त्या महसूलातून सरकार उच्चशिक्षणावर खर्च करतंय. हा खर्च योग्य नाही. त्या शिक्षणावरील खर्चाचा शेतकऱ्यांना काडीचा फायदा होत नाही. ती विद्वत्ता त्यांच्या वाट्यालाही येत नाही. तिचा पूर्ण फायदा उच्चभ्रु समाजातील 'वामणांनाच' होतो."
 
सत्या सत्याशी मन केले ग्वाही|
मानियले नाही बहुमता ||
महात्मा फुले
 
महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात संवाद रूपाने मांडणी केली आहे. सामाजिक विषमतेची चिरफाड व शूद्र अतिशूद्र यांच्या आर्थिक दास्यत्वाचे मर्मभेदी वर्णन या ग्रंथात फुल्यांनी करून अमेरिकेतील निग्रो,काळे लोक गुलामीच्या विरोधी लढ्यात साथ देणाऱ्या सदाचारी लोकांना हा ग्रंथ अर्पण केलेला आहे .
धार्मिकतेच्या नावाखाली वामन विचारसरणीतून आर्थिक छळवणूक कशी होते.ते वर्णिले असून विविध कर्मकांडांत कसे जन्म घेते . भोळ्या भाबड्या शूद्र आदी लोकांचे कसे शोषण करते असा गुलामगिरी एक स्फोटक ग्रंथ आहे. दीनदलितांच्या गोरगरिबांच्या शोषितांच्या पीडितांच्या अश्रूने पेट देण्याचे सामर्थ्य या ग्रंथात आहे.
 
महात्मा फुले यांनी या ग्रंथामध्ये पुराणातील अवतारवादी कल्पनेला साफ नाकारलेले आहे. विष्णूचे दहा अवतारातील मच्छ, कुर्म, वराह ,नृसिंह ,वामन परशुराम इत्यादी अवतारवादाची ते हजेरी घेतात. अवतार वाद नेमका तर श्रमिकांना गुलाम बनवणारा परिश्रम न करण्यासाठी फलदायी ठरणारा असा हा अवतारवाद श्रमिकांच्या मानगुटीवर बसून तो कायमचा बळीराजाला नागवतो आहे आणि म्हणूनच या अवतारवादाला त्यांनी जबर आव्हान दिलेले आहे. अवतारवादाला छेद देणे म्हणजेच श्रमिकांच्या मानव मुक्तीचा मार्ग दाखवणे आणि हेच काम त्यांनी केले.
 
इंग्रज सरकारचे शासन जरी होते.तरी कोर्टकचर्यांमध्ये वामनाचेच वर्चस्व होते. याविरुद्ध बंड उठवण्याचे कार्य महात्मा फुले करतात.
 
शेतकरी विद्वान का नाही?
त्या काळी शेतकऱ्याच्या घरात पूजा-कर्मकांड, जातीतल्या परंपरेमुळे त्याची तथाकथित उच्चवर्णीय जातींकडून कशी फसवणूक, शोषण होतेय याचे दाखले देत फुलेंनी शेतकऱ्याच्या दयनीय अवस्थेच चित्र उभं केलं. तर दुसरीकडे ब्रिटीश सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कसा नागवला गेलाय याचे दाखले दिले.
 
शेतकऱ्याची दारूण अवस्था कशामुळे झाली हे सांगताना फुले मांडतात-
 
गाई आणि बैलांच्या ब्रिटीशांनी कत्तली केल्याने शेतीत लागणाऱ्या चांगल्या बैलाचं बेण कमी झालं आहे. त्यामुळे शेतीत चांगले बैल मिळत नाहीत. तर अतिवृष्टीमुळे राज्यात ओला दुष्काळ पडल्याने जनावरांना चाराही मिळत नाही. शेतीतल्या जनावरांची संतती क्षीण होत चालल्याने त्यांना अनेक प्रकारचे आजार होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात बैल मरत आहेत.
शेतकऱ्याला बागायतीत चांगलं खत नसल्याने पीकही चांगलं काढता येत नाही.
 
कोलमडलेल्या कृषी व्यवस्थेमुळे शेतकरी कर्जबाजारी होतोय. सावकारांकडून शेतकऱ्यांचं अतोनात शोषण होतंय.
शेतमाल परदेशात जात असल्याने त्याची पर्वा ब्रिटीशांना नाही. तर दुसरीकडे कित्येक वस्तू सरकार आयात करत असल्याने स्थानिक अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे.
 
महाराष्ट्रातील ६५टक्के जमीन ओलिताखाली आणली आणि पीक पद्धती बदलली .तरच शेतीचे प्रश्न मार्गी लागतील.
कर्जमाफी हे शासनाने दाखवलेले गाजर आहे असून आत्महत्या झालेल्या किती शेतकरी कुटुंबीयांना फायदा झाला आहे?
 
सन २००७ मध्ये उसाला द्यावयाच्या दराबाबत शेतक-यांचे आंदोलन प्रखर झाले .तेव्हा महाराष्ट्र सरकारने एक समिती नेमली. दराबाबत साखर आयुक्त व प्रतिनिधीमध्ये चर्चा झाली परंतु ज्याचा ऊस विकत घ्यायचा त्या शेतकऱ्याचा एकही प्रतिनिधी नव्हता.त्यावर युगात्मा शरद जोशी म्हणतात ,"शेतकऱ्यांच्या मालाच्या बाजारात शेतकऱ्यांची स्वतःची किंमत ही जनावरांच्या बाजारात म्हशीला असते तशी असते. हेडे ठरवतील ती!!"
 
"एग्रीकल्चर प्राइसेस अँड कॉस्ट "हा कमिशन कृषी मूल्य व खर्च आयोग यावर नियंत्रण ठेवतो.या आयोगावर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तीन चार प्रतिनिधी व्यक्तींची नेमणूक करावी. तसेच या आयोगाच्या सर्व कामाचे रेकॉर्ड सार्वजनिक करावे .अशी मागणी जोर धरू लागली.
 
या आयोगामार्फत पिकांच्या आधारभूत किमती एखाद्या फतव्यासारख्या घोषित केल्या जातात .यामागे उत्पादन खर्चापेक्षा शेतकऱ्याला आम्ही कमी किंमत देतो हे सत्य जनतेपुढे येऊ नये म्हणून काळजी घेतल्या जाते.डॉ. बुधाजीराव मुळीक ,मोहन धारिया, महेंद्रसिंग टिकैत,विजय जावंधिया, माधवराव मोरे अशासारखे कृषी अभ्यासक त्यात असले तर शेतकऱ्यांच्या मालाच्या उत्पादन खर्च विक्री किमती यासंबंधी अत्यंत उपयोगी माहिती शेतकऱ्याला उपलब्ध होईल.
 
केंद्रीय अंदाजपत्रकात २००८ मध्ये तथाकथित साठ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर झाली . या पाच वर्षात तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याची कारणमिमांसा करण्याचे सौजन्य देखील कोणत्याही केंद्र व राज्य सरकारने दाखवले नाही. शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष ,भारतीय किसान युनियन अशा शेतकऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेसोबत सरकारने साधी चर्चा देखील केली नाही. कर्जमाफी वरून पाच एकर विरुद्ध जादा एकर असा नवा वाद संघर्ष जमीन मालकांमध्ये निर्माण करण्यात आला.
 
पी चिदंबरम यांनी २०१८ च्या अंदाजपत्रक जाहीर करतांना युरिया, डीएपी, सुपर फॉस्फेट एसओपी ,एमओपी इत्यादी खतांच्या सुधारभूत किंमती जाहिर केल्या.
सबसिडी ७० हजार कोटी रुपयांच्या घरात जाणार अशी घोषणा केली. वास्तविक खते उत्पादक कंपनीला ५०० रुपये एवढा खर्च येत नाही तर निव्वळ २५० रुपये सबसिडी खर्च आहे. सबसिडी अर्थव्यवस्थेची लूटच सुरू आहे. ही जहरी रासायनिक खते घालून भारताची जमीन नापीक करण्याचे षडयंत्र सुरू आहे. सबसिडीची रक्कम शेतकऱ्यांना गाई ,म्हशी विकत घेण्यास दयावे.
 
तीन कृषी विषयक कायदे हे पूर्णतः शेतकरी हिताचे होते यामध्ये कायद्याने उत्पादन, प्रक्रिया ,वाहतूक ,साठवणूक आणि पणन या क्षेत्रात शेतकरी कुणासोबतही करार करू शकत होता. या कायद्याने अर्थव्यवस्था अधिक गद्यमान होणार होती .
 
जेनेटिक इंजिनिअर सारख्या शोधातून क्रांती शक्य होती. तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना मिळणार होते. बेरोजगारी संपवण्याचे हत्यार, साधन हे कायदे ठरणार होते. परंतु शेतकरी पुन्हा एकदा पारतंत्र्याच्या खाईत ढकलला गेला .एवढं सगळ दिल्ली आंदोलनाने गमावले आहे.
 
नोव्हेंबर २००४मध्ये प्रा. एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली या 'नॅशनल कमिशन ऑन फार्मर्स'ची स्थापना झाली.त्यातील महत्त्वाच्या शिफारशी मांडल्या:
 
१. पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जादा भाव शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे.
२. शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची बियाणं कमी दरात मिळावीत.
३. गावांत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी व्हिलेज नॉलेज सेंटरची स्थापना व्हावी.
४. महिला शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिलं जावं.
५. शेतकऱ्यांसाठी कृषी जोखीम फंडाची स्थापना केली जावी. नैसर्गिक आपत्तींच्या काळात यामधून शेतकऱ्यांना मदत केली जावी.
६.अतिरिक्त आणि वापरात नसलेल्या जमिनीचं वितरण शेतकऱ्यांना केलं जावं.
७. शेतीयोग्य जमीन आणि वनजमिनी शेतीसोडून इतर वापरांसाठी कॉर्पोरेट कंपन्यांना देऊ नयेत.
८. कृषी विमा योजना सुविधा संपूर्ण देशभर सर्व पिकांसासाठी लागू करावी.
९.शेती कर्जाची सुविधा सर्व गरीब आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. सरकारच्या मदतीनं शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचा व्याजदर ४ टक्के एवढा केला जावा
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करण्याआधी महाराष्ट्राने मोघलकाळातील यातना, भयानकता अनुभवली. मृतप्राय समाज पुन्हा खडबडून जागा होईल हे अशक्यप्राय होते.पण हा शिवधनुष्य त्यांनी उचलला .या जुलमी राज्यकर्त्यांच्या बलाढ्य सत्तेचा मुकाबला केला .त्याप्रमाणे शेतक-याच्या उभ्या पिकाचे नुकसान होणार नाही.त्याच्या पिकाच्या देठालाही हात लावायचा नाही अशी सक्त ताकीद शिवरायांची होती
.
असाध्य ते साध्य करिती सायास या संत तुकारामाच्या शिकवणुकीप्रमाणे छत्रपती शिवरायांनी गलितगात्र समाजाला गनिमांच्या गर्तछायेतून प्रेरणा मिळावी या हेतूने बळीचे राज्य येण्याकरीता कंबर कसली.निश्चयांचा महामेरू,बहुजनप्रतिपालक रयतेच्या या राजाने , जिजाबाई व शहाजीराजांच्या मार्गदर्शनाने पुणे सुपे ,चाकण, इंदापूर या जहॉंगिरीत सोन्याचा नांगर फिरवला,जमीन कसली.त्यामुळे मावळ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले .
 
शेतकरी असंघटीत आहे.तो एकत्र येऊ शकत नाही.
वनी तो चेतवावा रे| शेतविकास चीती तो||
केल्याने होत आहे रे |आधी केलेच पाहिजे||या न्यायाने शेतक-याने एक होणे गरजेचे आहे.संघटित होऊन लढणे काळाची गरज आहे. गॅट करार,डंकेल प्रस्ताव, खुली अर्थव्यवस्था,एकाधिकारशाही,लेव्ही या प्रश्नावर शेतकरी संघटनेने व्यापक रान उठवून आंदोलने केली.त्याला काही डाव्या विचारसरणी असणा-या किसान सभा,सिटू सारख्या संघटनानी पाठींबा दर्शविला होता.
विष पचवता येते पण शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण करता येणार नाही.
साप पकडता येईल पण स्वतंत्र होण्यासाठी उपासमार थांबवण्यासाठी मुला बाळांना सुखी करण्यासाठी शेतक-याने उठायचं नाही ही फार मोठी शोकांतिका.बळीचे राज्य येणार आहे अशा पोकळ वल्गना राज्यकर्ते निवडणुकीच्या काळात फक्त आळवत असतात.
सौर ,पवन शक्तीचा वापर शेतकऱ्यांनी वाढवावा ही काळाची गरज आहे .No power is more expensive ऊर्जा नसणे या परिस्थितीपेक्षा कोणती ऊर्जा महाग नाही ह्याकडे लक्ष देणे जरूरीचे आहे. स्कूटर्स, कार, गाड्या ,मोबाईल फोन इत्यादी वस्तू खपाव्या म्हणून सरकार खाजगी कंपन्यामध्ये गुंतवणूक करते. त्याप्रमाणे सबसिडी देऊन सौरऊर्जेवरील वस्तू आणि सेवा स्वस्त व्हाव्या. याकरीता सरकारच्या प्रामाणिक प्रयत्नाची गरज आहे. सौर उर्जेवरील पंपसेट, मिनी ट्रॅक्टर, मोटरसायकल शेतकऱ्यांना परवडतील अशा दराने बाजारात उपलब्ध करावे तरच भारतीय शेतकरी समृद्ध होईल.
 
शेतमालास भाव मिळाल्यास निराशेचा अंधार नक्कीच दूर होईल.अशी आशा करू या
उषःकाल होता काळरात्र झाली.
 
शेतीच्या प्रश्नांची उत्तम जाण असली तरच उपाययोजना होईल. पाण्याचे नियोजन करण्यासाठी शेतकऱ्याच्या मुलाने शेतीसंबंधी ज्ञान आत्मसात करावे, विहिरी खोदणे, सुपीक गाळ वापरू देणे, शेती सुपीक होण्यासाठी शेळ्या मेंढ्यांचे खत रूजवणे, जंगली जनावरांपासून पिकांचे नुकसान रोखण्यासाठी शेतकऱ्यांना जुन्या बंदुका द्याव्यात किंवा पोलीस शिपायांकडून पिकाचे संरक्षण करणे,शेतसारा कमी करणे तसेच दुष्काळग्रस्तांना सारा माफ करणे इत्यादी उपाय करता येईल
 
अजित सपकाळ
अकोट
9766201539
Share