Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



शेतकरी संघटक : वर्धापनदिनाच्या निमित्ताने

प्रकाशीत: 
(वांगे अमर रहे पुस्तकात प्रकाशित)

वर्धापनदिनाच्या निमित्ताने

                 ही गोष्ट आहे १९८६-८७ च्या सुमारातली. सुरेश चोपडे सकाळी ६ च्या सुमारास माझ्या वर्धेतील खोलीवर आला आणि आल्याआल्याच अगदी दारावरूनच हुकूम सोडला.
                 “ए आवर रे पटकन, आपल्याला तातडीने निघायचे आहे.” मी सुद्धा कुठे,कशाला,कशाने वगैरे  कोणताही उपप्रश्न न विचारताच तयारी केली आणि बाइकवर बसलो. तो येतानाच रवीभाऊ काशीकर यांचेकडूनच बाइक घेऊन आला होता. रस्त्याने निघालो आणि मग सांगायला लागला. “मुरलीचा (मुरलीधर खैरनार) फोन होता. ‘आठवड्याचा ग्यानबा’ अंक प्रिटींगला गेलाय पण कागदाला पैसे नाहीत म्हणून छपाई थांबली आहे. आपल्याला आजच्याआज किमान शंभरतरी नवीन वर्गणीदार करून दुपारपर्यंत डीडी पाठवायचा आहे.” आणि मग सुरू झाली युद्धपातळीवर वर्गणीदार नोंदविण्याची मोहीम. तो काळच वेगळा होता. शेतकरी समाज शेतकर्‍यांची संघटना निर्माण झाल्यामुळे भारावला होता. संघटनेचे कार्यकर्ते एका ध्येयाने झपाटले होते. काहीतर चक्क वेडे झाले होते. परभणी अधिवेशनावरून परतलेल्यांना “परभणी पागल” अशी उपाधीच बहाल झाली होती. मग आम्ही मोर्च्या वळवला नेमक्या अशाच घरांकडे. त्यातील बहुतांश आधीच वर्गणीदार होते आणि तरीही प्रत्येकाने पावत्या फाडल्यात. पैसे दिलेत. यामागे ‘आठवड्याचा ग्यानबा’ चालला पाहिजे ही भावना होतीच पण त्याहीपेक्षा शरद जोशींच्या माणसांना ’नाही म्हणायचे नाही’ हीच प्रबळ भावना होती. आम्ही दुपारपर्यंत उद्दिष्ट पूर्ण केले आणि डीडी काढून नाशिकच्या दिशेने रवाना केला.
                 शेतकर्‍यांमध्ये कार्य करणे किंवा शेतकर्‍यांसाठी साप्ताहिक चालविणे किती कठीण असते याची जाणीव चळवळीबाहेरच्या जनतेमध्ये असतेच असे नाही. शेतकरी संघटनेचा विचार अधिक प्रभावीपणे आणि बिगरशेतकरी, शहरी माणसांपर्यंत पोचला पाहिजे या उद्देशाने नाशिक येथून ‘आठवड्याचा ग्यानबा’ हे साप्ताहिक सुरू करण्यात आले होते; पण तो प्रयोग काही फारसा यशस्वी झाला नाही आणि साप्ताहिक ८-९ महिन्यातच बंद पडले. पुन्हा शेतकरी संघटकची धुरा म्हात्रे सरांच्या खांद्यावर आली.
                 शेतकरी संघटनेसारख्या व्यापक जनाधार असलेल्या आणि इतिहासातल्या सर्वात मोठ्या शेतकरी आंदोलनाचे आंबेठान येथील मध्यवर्ती कार्यालयाचा संपूर्ण कार्यभार एकट्या प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे सरांनीच एकहाती सांभाळावा, असे विधिलिखितच असावे, असे वाटते. कारण सरांमागचा कामाचा व्याप कमी करण्याचे सर्वच प्रयोग असफल ठरलेत. प्रशिक्षण शिबिरे असोत की शेतकरी संघटक,  कार्यालयीन पत्रव्यवहार असो की आणखी काही, सर्व सांभाळायचे काम म्हात्रे सरांकडेच. शरद जोशींना पर्याय बनू पाहणारे संघटनेत खूप झालेत, शरद जोशींपेक्षा आपणच काकणभर सरस आहोत, अशी दिवास्वप्नेही अनेकांना पडलीत; पण म्हात्रे सरांना पर्याय सोडाच पण निदान मददगार तरी व्हावे, या वाटेला चुकून देखील कोणी गेले नाही. सरांवरचा प्रशिक्षण शिबिरांचा भार कमी करण्यासाठी चंद्रकांत वानखेडे आंबेठानला होते; पण काही महिनेच. त्यानंतर अमर हबिब, ब.ल.तामस्कर, कालिदास आपेट आणि स्वतः मी सुद्धा आंबेठानला होतो, पण वर्षभरच. म्हणजे गेल्या तीस वर्षामध्ये केवळ वर्ष-दीड वर्षाचा अल्पकाळ सोडला तर मध्यवर्ती कार्यालय आणि शेतकरी संघटक या दोन्ही जबाबदार्‍या म्हात्रे सर ‘एकटेच’ समर्थपणे सांभाळत होते.
                 शेतकरी संघटक औरंगाबादवरून प्रकाशित व्हायला लागल्यापासून सरांवरील भार कमी व्हायला नक्कीच मदत झाली असावी. कार्यकारी संपादक श्री श्रीकांत उमरीकर यांच्या अथक प्रयत्नाने संघटकच्या स्वरूपातही आमूलाग्र बदल झालेला आहे. अंक देखणा आणि वाचनीय झाल्याने वर्गणीदार संख्याही वाढायला लागली आहे; पण शेतकरी आंदोलनाचा विचार अधिक व्यापकपणे रुजविण्यासाठी एवढे पुरेसे नाही. शेतकरी संघटक प्रत्येक गावात, प्रत्येक घरात पोचायला हवा. महाराष्ट्रातील सर्व बूकस्टॉलवर दिसायला हवा. हे उद्दिष्ट सोपे नसले तरी कठीण नाही कारण शेतकरी संघटना किंवा शेतकरी संघटक सारखे पाक्षिक चालवणे किती कठीण असते, हे चळवळीत काम करणार्‍यांना देखील पक्के ठाऊक आहे म्हणूनच शेतकरी संघटनेला ‘वेडेपीर’ मिळालेत. घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणारे सैनिक मिळालेत आणि पदरचे पैसे खर्च करून शेतकरी संघटनेची आपल्या आईसमान जोपासना करणारे कार्यकर्तेही मिळालेत.
                 ६ एप्रिलला शेतकरी संघटकला २७ वर्षे पूर्ण होत आहे. जाहिराती न घेता निव्वळ वर्गणीदारांच्या बळावर एवढा प्रदिर्घकाळ वाटचाल करणे, वाटते तेवढे सोपे नाही.  शिवाय ज्या पाक्षिकाचा वर्गणीदार बहुतांश प्रमाणावर शेतकरी आहे, ज्याचे लिहिण्यावाचण्याशी हाडवैर आहे, अशा वर्गणीदारांना घेऊन, त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करून त्यांना निदान शरद जोशींचे लेख वाचायला लावण्याइतपत त्यांच्यात वाचनाची रुची निर्माण केली, ही शेतकरी संघटकची फार मोठी उपलब्धी मानावी लागेल. शेतकरी संघटक वेळेवर आला नाही आणि शरद जोशींचा लेख वाचायला मिळाला नाहीतर लोक कसे कसावीस होतात, हे मी अनेकदा अनुभवलं आहे. शरद जोशींना आणि शेतकरी संघटनेच्या विचारांना शेतकर्‍यांच्या माजघरातील देव्हार्‍यापर्यंत पोचविण्याचं ऐतिहासिक कार्य शेतकरी संघटकने आजवर चोखपणे बजावलं आहे, हे सत्य आहे, निर्विवाद आहे आणि यापुढेही ते अधिक जोमाने चालत राहील याची खात्री आहे.
                                                                             गंगाधर मुटे
-----------------------------------------------------------------------------
Share