भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शासन हे ‘कल्याणकारी राज्य’ या संकल्पनेवर आधारीत आपला राज्य कारभार करते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिक ते समाजातील वंचित घटकांना मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असते. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या तळागाळातील घटकांना लाभदायी ठरत आहे. नागरिकांचा जीवनस्तर उंचावण्याबरोबरच राज्याचा आर्थिक कणा असलेला बळीराजा अधिक सक्षम होण्यासाठी राज्यशासन विविध योजना राबवत असते. राज्य शासनाच्या अशा योजनांपैकीच शेतकऱ्यांना स्वावलंबी घडविण्यासाठी अस्तित्वात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना होय.
सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरीता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, सुधारित आदिवासी क्षेत्रांतर्गत उप-योजना, सुधारित आदिवासी क्षेत्राबाहेरील उप-योजना अंतर्गत पात्र लाभार्थींना मागणीनुसार व मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील घटकांचा लाभ देण्यात येणार आहे.
● डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत देय बाबी
नवीन विहीर प्रती लाभार्थी देय उच्चतम अनुदान मर्यादा रु.2 लाख 50 हजार, जुनी विहीर दुरुस्ती उच्चतम अनुदान मर्यादा रु.50 हजार, शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण उच्चतम अनुदान मर्यादा रु.1 लाख, वीज जोडणी आकार उच्चतम अनुदान मर्यादा रु.10 हजार, पंपसंच उच्चतम अनुदान मर्यादा रु. 25 हजार, इनवेल बोअरिंग उच्चतम अनुदान मर्यादा रु.20 हजार, सूक्ष्म सिंचन संच (अ) ठिबक संच उच्चतम अनुदान मर्यादा रु.50 हजार (ब) तुषार संच उच्चतम अनुदान मर्यादा रु. 25 हजार.
● सुधारित आदिवासी क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील उप-योजनेंतर्गत देय बाबी
नवीन विहीर प्रती लाभार्थी देय उच्चतम अनुदान मर्यादा रु.2 लाख 50 हजार, जुनी विहीर दुरुस्ती उच्चतम अनुदान मर्यादा रु.50 हजार, शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण उच्चतम अनुदान मर्यादा रु.1 लाख, वीज जोडणी आकार उच्चतम अनुदान मर्यादा रु.10 हजार, परसबाग उच्चतम अनुदान मर्यादा रु. 500/-, इनवेल बोअरिंग उच्चतम अनुदान मर्यादा रु.20 हजार, सूक्ष्म सिंचन संच (अ) ठिबक संच उच्चतम अनुदान मर्यादा रु.50 हजार, (ब) तुषार संच उच्चतम अनुदान मर्यादा रु. 25 हजार.
पात्र शेतकऱ्यांस नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण यापैकी कोणत्याही एका बाबीचा लाभ घेता येईल व त्यासोबत मागणीनुसार वीज जोडणी आकार, पंपसंच, इनवेल बोअरिंग, सूक्ष्म सिंचन संच (अ) ठिबक संच (ब) तुषार संच इतर बाबींचा लाभ घेता येईल. ठिबक किंवा तुषार संचापैकी एका बाबीचा लाभ घेता येईल. सुक्ष्मसिंचन घटकासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान म्हणुन 90 टक्केच्या मर्यादेत अनुदान देय आहे. वरील घटकांपैकी काही घटक उपलब्ध असल्यास उर्वरित आवश्यक घटकांचा लाभ विहित मर्यादेत देय आहे.
जर शेतकऱ्यास महावितरणकडून सोलरपंप मंजूर झाला असेल तर पंपसंच व वीजजोडणीसाठी देय अनुदानाच्या मर्यादेत रुपये 35 हजार लाभार्थी हिस्सा रक्कम डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमध्ये महावितरण कंपनीस अदा करता येईल व सुधारित आदिवासी क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील उपयोजनेमध्ये आदिवासी विकास विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनेसाठी सदरची रक्कम महावितरण कपंनीस अदा करता येईल. यासाठी अधिक माहितीसाठी
www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील योजनांच्या मार्गदर्शक सूचना पहाव्यात.
● लाभार्थी निवडीसाठी अटी व शर्ती
● डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती/ नवबौध्द शेतकरी असावा. (सक्षम प्राधिकारी यांच्याकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र असावे.) सुधारित आदिवासी क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील उप-योजनेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जमाती / आदिवासी शेतकरी असावा. (सक्षम प्राधिकारी यांचेकडील कुटुंबातील सदस्याचे अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र असावे.)
● जमीन धारणेचा अद्ययावत 7/12 दाखला व 8 ‘अ’ उतारा आवश्यक असून शेतकऱ्यांच्या नावे एकूण जमीन धारणा 0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत असावी.
●आधारकार्ड व आधारकार्ड संलग्न बँकखाते असणे आवश्यक आहे.(आधारकार्ड व बँकखाते पासबुक प्रत)
● दारिद्रय रेषेखाली असल्याबाबतचे प्रमाणपत्र / बीपीएल कार्ड असावे. नसल्यास शेतकऱ्याचे 2016-17चे वार्षीक उत्पन्न प्रमाणपत्र रु.1 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे.(तहसिलदार यांचे उत्पन्न प्रमाणपत्र)
●ग्रामसभेचा ठराव आवश्यक.
●प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असावी.
●डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी दारिद्रय रेषेखालील, महिला व अपंग लाभार्थ्यास प्राधान्य देण्यात येईल. सुधारित आदिवासी क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील उप-योजनेसाठी दारिद्रय रेषेखालील, आदीम जमाती, वन्नहक्क पट्टे धारक लाभार्थी, महिला व अपंग लाभार्थ्यास प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर तालुकानिहाय लक्षांकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास उर्वरित अर्जातून लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
● अर्ज करण्याची पध्दत
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी
www.krishi.maharashtra.gov.in किंवा
https://agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि.30 नोव्हेंबर 2017 पर्यंत राहील.ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत अर्जदाराने आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रतीसह कृषी अधिकारी (विघयो), पंचायत समिती यांच्याकडे सादर करावी. तसेच यापूर्वी पंचायत समिती कार्यालयास अर्ज सादर केला असल्यास शेतकऱ्यांनी ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज सादर करण्याची दक्षता घ्यावी.
● अधिक माहितीसाठी संपर्क कार्यालयाचे नाव
कृषी अधिकारी (विघयो), पंचायत समिती कार्यालये यांच्याकडे संपर्क करावा.
(स्रोत : महान्यूज)