Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



माणसाचा नव्हे साधनांचा विकास - भाग ४

लेखनप्रकार : 
आयुष्याच्या रेशीमवाटा
वाङ्मयशेती: 
आयुष्याच्या रेशीमवाटा
"आयुष्याच्या रेशीमवाटा" - भाग ४
माणसाचा नव्हे साधनांचा विकास
 
शारीरिक, मानसिक थकवा घालवण्यासाठी पुरेशी विश्रांती मिळावी म्हणून शासकीय कर्मचार्‍यांसाठी पाच दिवसांचा आठवडा, असा नुकताच शासनाने निर्णय घेतला. पण दिवसभर टेबलाच्या आसऱ्याने खुर्चीवर बसून इकडल्या फाइल तिकडे हालविणाऱ्या (कामचुकार?) लोकांना थकवा येतो, ही संकल्पना सर्वसाधारणपणे शारीरिक कामे करणाऱ्यांना अजिबात मान्य होऊ शकत नसल्याने विषय चेष्टेचा ठरतो कारण सुखासीन जीवन हे शारीरिक दुर्बलतेचे कारण असते हेच जवळजवळ सर्वांना अमान्य असते.
 
महिलांचे सक्षमीकरण, सबलीकरण करणे अशा तऱ्हेचा विचार सुद्धा अधूनमधून उचल खात असतो पण सबलीकरण, सक्षमीकरण म्हणजे नेमके काय? याचे उत्तर कुणाकडेच नसते. सर्वसाधारणपणे सर्व सोयी-सुविधा पुरवल्या की सक्षमीकरण होते असा काहीसा तर्क त्यामागे असतो. सोयी-सुविधांनी शारीरिक सक्षमीकरण, सबलीकरण होण्याऐवजी उलट खच्चीकरणच होत असते, याचे भान कुणालाच नसते.
 
मानवी उत्क्रांतीच्या प्रवाहात माणसाचा प्रचंड वेगवान गतीने प्रगती आणि विकास झाला, असा एक सार्वत्रिक समज आहे पण माणसाने खरंच प्रगती किंवा विकास केला काय? याचा आढावा घेण्याची कुणीच तसदी घेऊ इच्छित नाही. जर आढावा घेतला तर जे निष्कर्ष निघतात ते अगदीच उलट निघतात. आदिमानव अवस्थेपासून तर सद्य अवस्थेपर्यंत मानवाची प्रगती होण्याऐवजी केवळ अधोगतीच झालेली आहे. काळाच्या ओघात दिवसेंदिवस माणसाची उंची कमी होत गेली, शरीरयष्टीचा घेर कमी होत गेला, वारा, ऊन, पाऊस, थंडी आणि नैसर्गिक बदलाशी जुळवून घेण्याची प्रतिकारशक्तीही कमी होत गेली हे ऐतिहासिक सत्य आहे. बौद्धिक विकास म्हणावा तर तसेही काही दिसत नाही. प्रगल्भता, विवेक, तारतम्य, कल्पनाशक्ती या पातळीवरही मनुष्याने प्रगती केली अशा काहीही पाऊलखुणा आढळत नाहीत. पौराणिक काळात राम, रावण, बिभीषण, लक्ष्मण होते तीच स्थिती आजही कायम आहे. माणसातला रावण मेला नाही आणि रामही जागा झालेला नाही. मानवी वृत्तीचे त्या वेळेस जे प्रमाण असेल तेच प्रमाण आजही कायमचे कायमच आहे. चोर-लुटेरे-डाकू-चरित्रहीन काही प्रमाणात तेव्हाही होते; आजही आहेत. सभ्य-सज्जन-शीलवान-चरित्रवान काही प्रमाणात तेव्हाही होते; आजही आहेत.
 
माणसाचा विकास, प्रगती वगैरे काहीही झालेली नाही. केवळ मानवी अवस्था बदलली. वास्तुशिल्प, शिल्पकला, हस्तकला आणि वाङ्मय या क्षेत्रातील पूर्व कामगिरी बघून तर आज अचंबित होऊन चमत्कारिक वाटायला लागते. शारीरिक, आत्मिक अथवा बौद्धिक विकास वगैरे काहीही झालेला नाही. जो विकास झाला तो मनुष्यजातीचा विकास नसून केवळ साधनांचा, तंत्र आणि यंत्राचा विकास आहे. साधने जसजशी विकसित होत गेली तसतशी मानवी अवस्था बदलत गेली. समाजव्यवस्था सुद्धा कधीही निर्दोष नव्हती. ती सदैव एका सदोष अवस्थेकडून दुसऱ्या सदोष अवस्थेकडे सरकत राहिली. प्रगत तंत्र आणि साधनांच्या विकासामुळे मनुष्याचे ऊन, वारा, पाऊस, थंडी, वादळ, वातावरणातील बदल यापासून कृत्रिम संरक्षण झाले, जगणे आरामी-हरामी झाले, कष्टाची कामे सुसह्य आणि सुलभ झाली पण याच प्रगतीमुळे मनुष्याचा निसर्गाशी संपर्क तुटल्याने नैसर्गिक प्रतिकारक्षमता आणि सहनशीलता कमी झाली.
 
सर्व साधनसामुग्रीचा लाभ घेत घेत ऐषोआरामात जीवन कंठण्याच्या शैलीमध्ये प्रसूतीच्या वेळी सिझरिंगचे प्रमाण वाढत असताना नैसर्गिक अवस्थेतील समाजशैली मध्ये मात्र अजूनही तशी वेळ ओढवलेली नाही. माझी एक कष्टकरी रक्ताची नातेवाईक गरोदर असूनही एकटीच शेतात कामाला गेली होती. अकस्मात प्रसूती कळा सुरू झाल्याने तिथेच बाळंत झाली. तिने स्वतःच्या हाताने स्वतःचेच बाळंतपण उरकले. लेकरू ओट्यात घेतले आणि एकटीच शेतातून दोन किलोमीटर अंतरावरील गावातल्या घरी स्वतः चालत चालत आली. आता मायलेकी दोघेही धडधाकट आहेत. ज्यांनी बालपणापासून सायकल, बस अथवा कोणत्याही साधनांचा वापर केला नाही ती माणसे वयाच्या नव्वद-पंच्याण्णवव्या वर्षी सुद्धा चार-पाच किलोमीटर अंतर सहज पायी चालू शकतात, अशी अनेक उदाहरणे आपल्याला आपल्या सभोवताली दिसतात.
 
शोधात सावलीच्या असा घात झाला
की दिशा शोधण्यातच उभा जन्म गेला
 
निसर्गापासून गरजेपेक्षा जास्त विलगीकरण, अंतर राखले आणि सोयीसुविधांचा अतिरेक झाला तर माणसाचे जगणे सुसह्य होण्याऐवजी असह्य होऊन निसर्गानेच निर्माण करून ठेवलेल्या आयुष्याच्या रेशीमवाटा हळूहळू काटेरी वाटेत रूपांतरित व्हायला लागतात.
 
- गंगाधर मुटे आर्वीकर
=========
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन "आयुष्याच्या रेशीमवाटा"
भाग ४ - दि. १५ फेब्रुवारी, २०२० - माणसाचा नव्हे साधनांचा विकास
==========

आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी Fingure-Right http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========
 

Share