![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कथा एका आत्मबोधाची...!!
तो सर्प...! जन्मत: बिनविषारी होता
फ़ुत्कारणे त्याच्या गावी नव्हते
आचरण त्याचे सरळमार्गी....कुणाला न दुखावणारे
तेव्हा त्याच्यावर सगळे..... तुटून पडायचेत
कोल्हे-लांडगे खेकसायचेत... मुंग्या-माकोडे चावायचेत
अज्ञान-सज्ञान, सभ्य-असभ्य, शिक्षित-अशिक्षित
सुसंस्कृत-सुसंस्कारी ........ झाडून सगळीच
त्याला खडे मारायचीत
तो रडायचा....... केविलवाणी अश्रू ढाळायचा
कळवळायचा... असह्य वेदनांनी... कण्हायचा
पण दुसऱ्याच्या वेदनांवर पाझरेल... तर
ती जगरूढी कसली?
मग तो स्वबचावासाठी
जीव मुठीत घेऊन पळायचा.....आणि तरीही.....
पाठलाग करणारी पिच्छा पुरवायची....
खिदळत..... दात वेंगाडत...!
आणि मग एक दिवस........ एका निवांत क्षणी
त्याला आत्मबोध झाला.........!!
विचाराला कलाटणी मिळाली... कळले की
आक्रमणाला उत्तर बचाव नसते...
तलवारीला उत्तर ढाल नसते....
'अहिंसे'चे अर्थ भेकडपणात नसते.
"आक्रमणाला आक्रमणानेच" आणि
"तलवारीला तलवारीनेच" उत्तर द्यायचे असते....!!!
आणि मग....... आणि मग त्याने.....
त्याने श्वास रोखला..... आणि सगळे बळ एकवटून.....
असा काही फ़ुत्कार सोडला की...........!!!!
आता......
कोल्हे-लांडगे कान पाडून पळत होती,
कुत्रे शेपट्या खाली करून पळत होती,
आणि माणसे?.... माणसे जीव मुठीत घेऊन....
जीवाच्या आकांताने सैरावरा पळत होती...!!!!
कारण.........कालचा बिनविषारी साप
अभयपणे आजचा....
जहाल विखारी नाग बनला होता.... ...!!!!!
गंगाधर मुटे
....................................................................
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
....................................................................