
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
|| शेतकऱ्यांचा राजा शिवाजी ||
(प्रजावत्सल राजा शिवाजी)
समाज व्यवस्था ही संपत्तीच्या आधाराने समृद्ध व सुरक्षित जीवन जगत असते. यंत्र युग आल्यानंतर संपत्तीचे स्वरूप बदलत गेले. परंतु तत्पूर्वी शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी बलुतेदारांनी, (लोहार, सुतार, चांभार, तेली, माळी, साळी, गवंडी, शिंपी, कोष्टी,रंगारी, सोनार, वाहतूकदार,दुकानदार, व्यापारी इत्यादी) राबावे, त्यातून संपत्ती निर्माण करावी व त्या आधाराने जगावे यात ८०% कष्टकरी, शेतकरी. राजाकडून सुरक्षा मिळावी, न्याय मिळावा ही रास्त अपेक्षा.
परंतु शिवपूर्व काळाचा विचार केला तर असे दिसते की, राज्यकारभार नव्हे तर लुटारूंच्या फौजा, प्रजेचा छळ यांनी भरलेली अंधधुंदी यांचा उच्छाद मांडलेला दिसतो. भारत खंडाच्या इतिहासात जो उपलब्ध आहे त्यानुसार भारतात छोटी छोटी राज्य होती त्यांचा अहंकार, विस्तारवाद त्यासाठी आपापसात लढाया होत होत्या. त्यात सामान्य माणसाची लूट जाळपोळ व्हायची. ते प्रजेसोबत वाटेल तसे वागायचे त्यासाठी देशी-विदेशी असा फरक नसायचा. मुसलमानी आक्रमणे येई पर्यंत व नंतरही स्थिती सारखीच.त्यांच्यात लढाया व प्रजेवर जुलूम. त्यामुळे प्रजेचे जीवन अत्यंत अस्थिर. देशी-विदेशी सरकारे होऊन गेली. ती सर्व एक प्रकारच्या पोटभरू चोरांची टोळी आहे. अशी गावकऱ्यांची स्पष्ट समजूत झालेली होती.
--- वतनदाराची शिरजोरी ---
शिवपूर्वकाळात शेतकरी समाज वतनदाराच्या लहरीवर जीवन जगत असे.दुष्काळ,अतिवृष्टी,नासाडी, नापिकी, काहीही असो वसुली मात्र वतनदाराच्या मर्जीप्रमाणे,लहरीप्रमाणे अशा स्थितीत शेतकरी प्राण भयाने डोंगरदऱ्यामध्ये लपून बसायचे अशी इतिहासात ठिकठिकाणी नोंद आढळते. वतनदाराचा विरोध कोण घेणार? वसुली नाकारणे म्हणजे संसाराची राख रांगोळी, धूळधाण करून घेणे. प्रजेला लुटणे आणि बादशहाचा खजिना भरणे, रयतेची चिंता कोणालाच नाही. त्यामुळे शेती व शेतकरी व गाव गाड्यांचा संबंध पूर्णपणे तुटलेला होता. गावकरी शेतकरी यांच्यावर सत्ता चाले ती गाव वतनदार, परगणे वतनदार किंवा सुभेदार यांची. देशमुख, देशपांडे, पाटील,कुलकर्णी हा वतनदार असे. काळी, पांढरी, गावचे शिवार, चराऊ जमीन, पडीत जमीन, यावर पाटलांची सत्ता चाले तर कुलकर्णी हा वतनदार असे.परगण्याची रयत व भूमी यावर मालकी देशमुख असे. त्यांचे सहाय्यक देशपांडे होते ज्या राज्याशी परगणा जोडलेला असेल त्या राजाच्या राजाला धान्य रोख रक्कम जी लागेल ती पुरवीत असे. वसुलीच्या परगण्यासाठी ते राजाला जबाबदार असत. कोणाकडून कोणत्या शेतीवर किती वसूल घ्यायचा? व व्यापाऱ्याकडून किती घ्यायचा? हे स्वमर्जीने देशमुख ठरवत असे. तो आपल्या पदरी पेशवा बाळगत असे. अशाप्रकारे रयतेच्या दृष्टीने परगण्याचा राजा देशमुख. या देशमुखाला स्वतंत्र मुद्रा मिळत होती. परगण्याच्या दप्तरावर देशमुखाचा शिक्का असणे आवश्यक होते.अशी राज्यव्यवस्थेची रचना होती. विशेष म्हणजे राजाच्या तिजोरीत भरायच्या रकमेपेक्षा कितीतरी पटीने अधिक रक्कम वतनदाराच्या फौजा रयते कडून वसूल करीत असे. त्या पैशावर गढी, वाडे, कोट बांधून सैन्य बाळगावे व स्वतःलाच राजे म्हणून घ्यावे. ते शक्तिशाली झाल्यामुळे त्यांना सांभाळणे हेच रयतेसाठी काम होऊन बसले होते. तसेच त्यांना थोडा जरी राजाकडून त्रास किंवा उपद्रव झाला तरी शत्रु गोटात सामील होत आणि आपल्याच राज्याच्या विरोधात लढण्यास उभे राहत.
--- शिवाजी राजांचे कौशल्य ---
वतनदाराचा बंदोबस्त करणे, त्यांच्या जुलमातून रयतेला मुक्त करणे, परगण्याची सुरक्षितता ठेवणे, शेती पिकवणे, प्रजेचा संबंध प्रत्यक्ष स्वराज्याशी जोडणे. हे अत्यंत अवघड नाजूक कामगिरी शिवाजीराजांनी अत्यंत कौशल्याने करून दाखविली. त्यांनी कुळ अनामत करून त्यांना त्या त्या गावची परिस्थिती पाहून बांधून दिले, स्वराज्यातील वतनदारांनी बुरुजाचा वाडा बांधून किंवा कोट बांधून किल्ल्यात राहू नये घर बांधून रहावे. असा नियम केला वतनदाराचे कोट पाडून त्यात स्वराज्याची ठाणी बसविली. रयतेवर जुलूम केल्यास हातपाय तोडण्यापासून प्राणदंडापर्यंत उग्र शिक्षा ठोठावल्या. सुभेदार, मामलेदार,कामवीसदार, हवालदार, मुजुमदार, तरफदार यासारखे पगारी सरकारी अधिकारी नियुक्त केले. अशा प्रकारे रयतेचा संबंध स्वराज्याशी हळूहळू जोडला गेला. वतनदाराचे पिढ्यानपिढ्या चालत आलेले जमिनीचे हक्क, प्रतिष्ठा, मानसन्मान यांना जराही धक्का लागू दिला नाही. वतनदारी नष्ट करताना महाराजांनी थोडी कठोरता दाखविली. परंतु मायेची फुंकर घालून स्वराज्याचे महत्त्व पटवून देऊन, स्वाभिमानाला आणि शौर्याला आव्हान करून, काही वतनदारांना राज्यकारभारात गुंतवून घेतले.आपल्या अधिकाऱ्यामार्फत स्वराज्याच्या खजिना समृद्ध करीत असतानाच वतनदारी मोडून काढण्याचे कसब अनन्यसाधारण म्हणावे लागेल. याद्वारे शेकडो वर्षाच्या शेतकऱ्यांच्या लुटीचा काळ संपत होता.
--- रयतेचा राजा शिवाजी ---
सर्व जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांची योग्यता तपासून महाराजांनी शेतीची कामे आटोपल्यानंतर नांगरा सोबत तलवार गाजवायचे प्रशिक्षण घेऊन मुलुखगिरीवर पाठवायचे त्यांच्या योग्यतेनुसार मानसन्मान द्यायचे. आता वतनदाराचे सैन्य महाराजा सोबत नव्हते. जे होते ते स्वराज्याचे होते.
शिवाजी राजांच्या जीवनातील अनेक प्रसंगावरून असे दिसते की, राज्य चालवणे, राज्यविस्तार करणे हे केवळ इतकेच त्यांचे लक्ष नव्हते तर शेतकऱ्यांच्या हितासाठी, संरक्षणासाठी त्यांनी माघार सुद्धा घेतली. त्यांनी मान सन्मानाचा किंवा प्रतिष्ठेचा प्रश्न होऊ दिला नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे १६६५ मध्ये दिल्लीश्वराने मिर्झाराजे जयसिंग यांना स्वराज्यावर स्वारी करण्यासाठी पाठवले असताना पुरंदरच्या तटाचा ७० दिवसानंतर ही वाळूचा कण सुद्धा बाहेर पडू दिला नाही. हे मिर्झाराजे जयसिंगाच्या लक्षात आले. तो अतिशय हुशार,शूर व मुत्सद्दी सेनापती होता.त्याने ओळखले की, शिवाजी राजाचा जीव किल्ल्याच्या बुरुजामध्ये किंवा राजगडच्या राजधानीत अडकलेला नाही. किल्ले जिंकून राजे शरण येणार नाही त्यांचे प्राण आहेत ते रयतेमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये जोपर्यंत ही रयत शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, तोपर्यंत किल्ले बुर्जावर मराठ्यांना जेरीस आणता येईल पण स्वराज्याचा बीमोड करता येणार नाही. याबद्दल जयशिंगाची खात्री पटली व त्याने नव्या रणनीतीचा अवलंब सुरू केला. मोगलाच्या फौजांना जुन्नर व तळ कोकणात धुमाकूळ चालवण्याचे आदेश दिले. या परिसरात किमान ५० खेडी उद्ध्वस्त करून जाळून टाकली, उभ्या पिकाची नासाडी केली, साऱ्याच्या गंजी पेटवून टाकल्या, या भागातील शेतकरी सुरक्षेसाठी डोंगर ,दर्या खोऱ्याच्या आधाराने चार खेड्यात गोळा झाली.तेथेही त्यांचा संघर्ष मोगली सैन्याची झाला. गरीब प्रजा, गुरेढोरे, मालमत्ता मोघलांच्या हाती लागली. अनेक माणसे बंदी झाली, अनेक ठिकाणी रयतेचा मोगली सैन्याशी संघर्ष झाला. शेकडो स्त्री,पुरुष व हजारो गुरेढोरे बंदी केले. त्यांचा अनन्वित छळ सुरू केला. ज्यांच्या सुखासाठी राज्य करायचे, त्यांचे जीवन उद्ध्वस्त होत असलेले राजांना सहन झाले नाही. राजांचे सैन्य अत्यंत चिवटपणे झुंज देत होते. मोगली सैन्य जेरीस आले होते. तरीही १२ जून ही महत्त्वाची तारीख, आगोठीचे दिवस. मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर पुढे पेरणीचे दिवस येतात. ही धुमचक्री थांबली नाही, शेतकऱ्यांची शेती पडीत राहिली तर मागील मोठा दुष्काळ (१६२८--३०) रयतेची अन्नांन्न दशा निर्माण होईल? ही भीती आ वासून उभी होती. राजांनी पुरंदरचा तह केला. शेतकरी आपल्या कामात लागले.राजाचा हेतू साध्य झाला.शेती व शेतकरी यांच्या बद्दल आस्थेचे हे अत्यंत जिवंत व बोलके उदाहरण आहे.
रणांगणावर घडलेले हे उदाहरण काही अखेरचा पुरावा नाही. युद्ध प्रसंग सोडून शेती व शेतकऱ्यांची राजे जातीने काळजी घेत. त्यांनी त्यांच्या राजपत्रात अनेक फर्मान काढले. उदाहरणार्थ,शेतीमालाची चोरी न करावी, भाजीच्या देठास, तेही मन न दूखविता राज दुरुस्त वर्तने,रयतेचा वाटा रयतेस पावे आणि राजभाग आपणास येईल असे करणे, कष्ट करून गाव गाव फिरावे, ज्या गावात (शेतकरी) किती आहेत? ते गोळा करावे. त्यात ज्याला जे शेतकऱ्यात कुवत, माणूस बल असेली त्या माफीक त्यापाशी बैल दाणे - सच आसीला तर बरेच जाले, त्याचा तो किर्द करील. ज्या शेतकऱ्यास कुवत आहे, माणूस आहे आणि जोतास बैल, नांगर नाही, पोटात दाणे नाही, त्यामुळे तो निकामी जाला असेल, त्याला रोख पैके देऊन,पोटात खंडी, दोन खंडी दाणे द्यावे. गल्ल्याचे पैके वाढी-दीढी न करता मुद्दलच ऊसणे हळूहळू घ्यावे. तवानगी माफीक घेत घेत वसूल करावा इ. याशिवाय विपरीत स्थितीत सरकारी वसूल व माफीचे सुद्धा राजपत्रात आदेश आहेत.यावरून शिवरायाची शेती बद्दलची दृष्टी स्पष्ट व स्वच्छपणे मांडली आहे इतकेच नाही तर पर मुलखात जात असतानाही शेतकऱ्यांच्या पिकाची ते अतिशय काटेकोरपणे काळजी घेत असे. एक काडी रयतेची घेऊ नये, आवश्यक त्या वस्तू बाजारातून घ्याव्या, कोणीही लूट करू नये. असे त्यांचे सक्त आदेश होते. या आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्यास शिर:छेदाची शिक्षा करून जरब बसविली होती. पर मुलखात राहणाऱ्या शेतकऱ्यांची काळजी घेणारा शिवाजी राजा हा सबंध भारत वर्षाच्या इतिहासात एकमेव आहे.
आग्र्याहून सुटका झाल्यानंतर त्यांनी बऱ्याच सुधारणा शेतीत करण्याचा प्रयत्न केला. पूर्वी वतनदार नजरेच्या अंदाजावर साऱ्याची रक्कम ठरवीत असे. राजांनी "काठी मोजणीने"५ हात +५ मुठी =१ काठी.२०×२० काठी =१ विघा.१२० विघे =१ चावर. इ. तसेच जमिनीची प्रतवारी ठरवून सारा ठरवण्याची पद्धत सुरू केली. अशा अनेक प्रकाराने कारभाराला अनुशासित केले. समाजाच्या प्रगतीची बिजे रोवली.
-- थोडे चिंतन --
रामदेवराया आधी लुटारु देशी होते, नंतर ते यावनी (मोगली) झाले, मग ब्राह्मणी झाले त्यानंतर फिरंगी (इंग्रज) आले, विलायती टोपीवाले नंतर खादी टोपीवाले आले. राज्यकर्त्या लुटारू,चोरांच्या टोळीचे स्वरूप बदलले पण स्थिती मात्र कायमच आहे. ते तलवारीच्या बळावर लुटत होते, हे लेखणीच्या बळावर लुटतात.आजही शेतकरी, स्त्रिया, मुले श्रम ,युवकांचे रोजगार, भविष्य किती सुरक्षित आहे? महात्मा ज्योतिबा फुले नंतर युगात्मा शरद जोशींनी एकमय लोक व प्रत्येकाला त्याच्या श्रममुल्याचा हक्क मिळण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. तेही निघून गेले. म्हणायला स्वातंत्र्य आहे पण "एकमय लोकराष्ट्र" निर्माण होऊ शकले नाही.
या सर्व अनेक शतकाच्या प्रवासात शिवाजी राजांच्या काळ अल्पकाळ जरी होता. तरी प्रजा वत्सलतेत झालेल्या सर्व राजात त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. त्यांना कोटी कोटी प्रणाम.
,------- दिलीप भोयर,धनोडी. ता.वरूड,अमरावती.
(मो. ८९९९६७३१४४.)