Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



लक्ष्मण खेडकर

लक्ष्मण खेडकर's picture
Email subscriptions: 
Email
Wall Post
लक्ष्मण खेडकर updates its status
September 27, 2018 at 01:49pm
कविता समजून घेताना भाग: २७ • शेत नांगरताना ट्रॅक्टरने नांगरताना शेत बांधावरला निघालेला दगड पाहून बाप हळहळला वाटलं असेल वाटणीचा निटूबा रवता येऊल पुन्हा म्हणून मीही केलं दुर्लक्ष पण बापाचे पाणावले डोळू पाहून न राहून विचारलं, "काय झालं, आबा?" सरळ करीत दगड बाप बोलला, "कही नही रं, गणिशाला मिठात पुरीलेल्या जाग्याची व्हती खुण" अन् बाप सांगू लागला मातीआड गेलेल्या बैलाचे गुण "घर, ह्या मळा, तुही साळा ह्याचाच तर जीवावर सारं उभं राह्यालं बाळा!" -लक्ष्मण खेडकर •• माणूस निसर्गाने निर्माण केला, पण नाती माणसाने तयार केली. त्यांना नावे दिली. ती जपण्यासाठी प्रयोजने शोधली. प्रयोजनांचे प्रासंगिक सोहळेही संपन्न केले. समूहाच्या काही गरजा सार्वकालिक असतात. त्यांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करावे लागतात. नितळपण घेऊन वाहते राहण्यासाठी त्यांना परिमाणे द्यावी लागतात. आयुष्याच्या वाटेने मार्गस्थ होताना अनेक गोष्टी कळत-नकळत सोबत करतात. कधी त्यांना सोबत घेऊन चालणे घडते. काही गोष्टी घडतात. काही घडवता येतात. काही टाळता येतात. काहींपासून पळता येतं. काही प्रत्येक पळ सोबत करतात. संस्कृतीचे संचित स्नेहपूर्वक सांभाळावे लागते. तो प्रवास असतो आपणच आपल्याला नव्याने शोधून घेण्यासाठी. याचा अर्थ संकृतीचे किनारे धरून वाहणाऱ्या सगळ्याच गोष्टी अगत्याने जतन कराव्यात असेही नसते. त्यांची प्रयोजने आकळली की, त्याच्या असण्या-नसण्याचे अर्थ उलगडत जातात. प्रघातनीतीच्या परिघात सामावलेल्या सगळ्याच गोष्टी काही टाकावू नसतात अन् सगळ्याच टिकावू असतात असंही नाही. ते पाहणे असते आपणच आपल्याला. तो प्रासंगिक गरजांचा परिपाक असतो. जगण्याच्या वाटेने घडणाऱ्या प्रवासात माणसाने अनेक गोष्टी संपादित केल्या. काही घडवल्या. काही मिळवल्या. नाती त्याने अर्जित केलेली संपदा असते. त्याच्या जगण्याची श्रीमंती असते. आयुष्याच्याचे काठ धरून वाहताना नाती एक अनुबंध निर्माण करीत राहतात. त्यांला प्रासंगिकतेची परिमाणे असतात, तशा प्राथमिकताही असतातच. याचा अर्थ मनात वसती करून असणाऱ्या सगळ्याच गोष्टी निवडता येतात असे नसते. हे चालणे असते नियतीने निर्धारित केलेल्या मार्गाने. नियतीचे अभिलेख ललाटी गोंदवून इहतली आलेला जीव जन्मासोबत काही घेऊन येतो. काही वाढता-वाढता मिळवतो. धमन्यातून वाहणाऱ्या रक्तासोबत पिढ्यांचा वारसा घेऊन जन्मदत्त नाती वाहत असतात. त्यांना निवडीचा पर्याय नसतो. आहेत तशी आणि आहेत त्या गुणावगुणासह ती स्वीकारावी लागतात. त्यांचं वाहणं सिद्ध असतं. त्यांना साधता येत नाही. सगळीच नाती काही रक्ताच्या प्रवाहासह नसतील वाहत; पण भावनानाचे किनारे धरून मनाच्या प्रतलावरून सरकत राहतात. यांच्या वाहण्याला रक्ताचे रंग देता येणे संभव नसले, तरी आस्थेचे अनुबंध घेऊन बांधता येणं शक्य असतं. त्यांना पर्याय असतात. भावनांच्या हिंदोळ्यावर विहार करणाऱ्या अशा नात्यांना आनंदाची अभिधाने असतात. त्यांच्याशी जुळलेल्या संदर्भांचं स्पष्टीकरण देता येतंच असं नसतं. अंतर्यामी विलसणारा नितळ स्नेह घेऊन ते आयुष्याला आकार देत असतात. जगण्याला लाभलेला नात्यांचा स्पर्श माणसांना नवा नाही. त्यांना निर्देशित करता येतं. असणं अधोरेखित करता येतं. म्हणूनच सत्तेची वस्त्रे अंतरावर ठेऊन सुदाम्यासाठी पुढे येणारा कृष्ण मैत्रीचं आभाळ होतं. अनुबंधाच्या धाग्यांनी विणलेल्या नात्यांना आयाम देणारं परिमाण ठरतं. स्नेह सेतू बांधून घडणारा हा प्रवास सौहार्दाचं सुखपर्यवसायी प्रत्यंतर असतं. नाती मोडता येतात, घडवता येतात. तोडण्यासाठी फार सायास करायची आवश्यकता नसली, तरी जतन करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयास करावे लागतात. स्नेहाच्या धाग्यांनी बद्ध होण्यात सौख्याची सूत्रे असतीलही. पण ती केवळ माणसांशी अनुबंधित असतात असे नाही. आपल्या आसपास असणाऱ्या अनेक गोष्टी आस्थेचे अनुबंध आकारास आणण्याचे कारण असू शकतात. कधी निसर्ग स्नेही होतो. कधी झाडे-वेली प्रेमाचा स्पर्श घेऊन बहरतात. कधी आपल्या मूठभर विश्वात कुठलातरी प्राणी आपलं चिमूटभर जग उभं करतो. म्हणूनच की काय संत ज्ञानेश्वरांनी ‘भूता परस्परे पडो मैत्र जिवांचे’ म्हटले असेल. हे मैत्र जगण्याला अधिक गहिरं करीत असतं. शेतीमातीत जन्म मळलेले आहेत, त्यांना मातीशी असणाऱ्या अनुबंधाच्या परिभाषा नाही शिकवाव्या लागत. त्याच्यासोबत जगणारे जीवही जिवलग होतात. कदाचित माणसांच्या मैत्रीपेक्षा हे नातं अधिक गहिरं असू शकतं. आस्थेचा ओलावा घेऊन ते जगण्यात सामावतं. शेतीमातीत रमणाऱ्याला वावरातील गवताच्या काडीशीसुद्धा सख्य साधता येतं. त्याच्याशी केवळ बहरलेलं शिवार, आकाशाशी गुज करणारी शेते अन् वाऱ्यासोबत डुलणारी पिके मैत्रीच्या धाग्यांनी बांधलेली नसतात. मूक सोबत करीत त्याच्या जगण्याला जाग देणारं एक जग गोठ्यात वसतीला असणाऱ्या गुरावासरांच्या संगतीने नांदत असतं. त्याच्यासाठी ते केवळ पशू नसतात. स्नेहाचा धागा त्यांना बांधून असतो. या नात्याला प्रगतीच्या परिभाषेत नाही कोंबता येत. अंतरीचा ओलावा घेऊन वाहत असते ते. यंत्रांचे पाय लावून धावणाऱ्या जगात या प्राण्यांचे मोल फारसे राहिले नसेल. कदाचित संकुचित होत जाणाऱ्या जगण्याच्या वर्तुळात त्यांना सामावण्याएवढं व्यापकपण उरलं नसेल. प्रगतीच्या वार्ता करणाऱ्या जगाला वेगाचा स्पर्श अधिक सुखावह वाटत असेल. पण प्रगतीच्या पावलांनी चालत येणारे सगळेच बदल काही यशाची प्रमाण परिमाणे नसतात. पावलांना प्रेमाचा स्पर्श घडला की, सौख्याचे मळे बहरतात. पण समाधानाच्या व्याख्याच बदलल्या असतील तर... प्रगतीची चाके पायी बांधून धावणाऱ्या जगण्याला जसा वेग आला, तशी माणसे स्वतःपासून सुटत गेली. स्नेहाचे संदर्भ घेऊन वाहणारे झरे आटू लागले. जेथे स्वतःलाच जागा नाही, ते इतरांना आपल्यात कसे सामावून घेतील? एक काळ होता सामावणे सहज घडत जायचे. शेतकरी म्हटला की, त्याचा जगण्याचा पसारा अनेक गोष्टींना आपल्यात घेऊन नांदायचा. कदाचित ही अडगळ वाटेल कोणाला. पण या अडगळीलाही आपलेपणाचे अनेक अनुबंध असायचे. या बंधांचा परीघ केवळ घर-परिवार एवढाच सीमित नव्हता. परिवार शब्दाची परिभाषा परिमित कधीच नव्हती. अपरिमित शब्दाचा अर्थ त्या असण्यात सामावलेला असायचा. खरंतर शेती केवळ पिकांनी बहरलेले मळे घेऊन, आनंदाचे सोहळे साजरे करीत निसर्गाच्या सानिध्यात रमणे नसते. त्याचं नातं सहवासात सामावलेल्या सगळ्याच गोष्टींची सोबत करणारं. त्याच्यासाठी गायी-वासरांच्या हंबरण्याने जाग येणारा गोठा एक नांदतं विश्व असतं. जिवाचा विसावा असतो तो. घरातल्या माणसांइतकाच जित्राबांनाही जीव लावण्यात कोणाला नवल वाटत नाही. हे प्राणी वाचा घेऊन आले असते, तर कदाचित आपल्या मालकाशी गुज करीत रमले असते. त्याच्या सुख-दुःखात हसले-रडले असते. अर्थात, स्नेह व्यक्त करण्यासाठी शब्दांची सोबत असायलाच लागते असेही नसते. अंगावरून ममतेने फिरणारा हातही बरंच काही सांगून जातो. मालकाच्या पावलांच्या आवाजाने कान टवकारून बघणारे मुके जीव त्याच्या स्पर्शाने पुलकित होतात. त्याच्या स्नेहार्द स्पर्शाने थरथरणारी त्यांची पाठ कृतज्ञतेचा प्रतिसाद असतो. प्राण्यांशी असणाऱ्या अनुबंधाना अधोरेखित करणारी ही कविता अशाच एक कृतज्ञ नात्याचे गोफ विणत मनात वसतीला उतरते. हे नातं माणसाचं माणसाशी नसलं म्हणून काही त्याच्या अर्थाचे आयाम नाही बदलवता येत. किंबहुना स्व सुरक्षित राखणाऱ्या स्वार्थी नात्यांपेक्षा, हे निर्व्याज नातं अधिक गहिरेपण घेऊन येतं. घराचं प्राक्तन पालटण्यासाठी जगणं विसर्जित केलं त्या मुक्या जिवाप्रती कृतज्ञता घेऊन येतं. मनाच्या हळव्या कोपऱ्यात वसतीला उतरलेलं हे जग जगल्याशिवाय कसे समजेल? हा प्रवास आहे अनुभूतीचा, नुसती सहानुभूती घेऊन कसा आकळेल? जावे त्याच्या वंशा शब्दाचा अर्थ आपलेपण घेऊन वाहणाऱ्या आस्थेच्या ओलाव्याजवळ येऊन थांबतो. कुण्या शेतकऱ्याला विचारा, त्याच्यासोबत हाडाची काडे करणाऱ्या बैलांचे त्याच्या जगण्यात स्थान नेमके काय आहे? लेकरांइतकेच त्याला ते मोलाचे वाटते. त्याच्या मनाच्या मातीतून उगवणाऱ्या हिरव्या स्वप्नांचे उत्तर या मुक्या जिवांच्या श्रमणाऱ्या जगण्यात सामावलेलं असतं. बापासाठी बैल गोठ्यात वसतीला असलेला केवळ एक प्राणी नसतो. जगण्यात उमेद पेरणारा हा जीव ऊनवारापावसाची तमा न बाळगता सोबत करीत झटत राहतो. त्याच्या धडपडीची प्रेरणा असतो. काळ बदलला काळाची समीकरणे बदलली. समाधानाचे अर्थ नव्याने अधोरेखित झाले. सुखांची गणिते सहज साध्य करणारी सूत्रे शोधली गेली. तसे जगण्यात कोरडेपण येत गेले. यंत्रांनी संवेदनांचे झरे आटवले. आयुष्याच्या वाटेवरचा वसंत अवकाळी परतीच्या प्रवासाला लागला. जगणं शुष्कपण घेऊन उभं राहिलं आहे. भावनांचं आपलेपण घेऊन झरत राहणं संपलं. व्यवहाराचे हेतू स्वार्थाच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करत असतील, तर पलीकडच्या वर्तुळांचं विश्व आकळेलच कसं? ही कविता माणसांचे माणसांपासून उखडत जाणं, उसवत जाणं अधोरेखित करते. मनाच्या मातीत पडलेल्या संवेदनांच्या निष्प्राण बिजांना धक्के देत राहते. माणसे माणसांना झपाट्याने विसरण्याच्या काळात भावनांना साद घालून माणूसपण शोधत राहते. शेत नांगरताना बांधावर रोवलेला दगड ट्रॅक्टरच्या नांगराचा फाळ लागून उखडला जातो. कदाचित शेताच्या वाटणीचा असेल आणि निघाला तर त्यात काळजी का करावी, पुन्हा नव्याने रोवता येईल म्हणून दुर्लक्ष होते. पण तो दगड पाहून बापाचे डोळे पाणावतात. कवी न राहून काय झालं म्हणून विचारतो. उखडलेला दगड सरळ करीत वडील म्हणाले, काही नाही, गणेशला मिठात पुरलेल्या जागेची खूण होती. हे सांगताना त्याच्या मनात कालवाकालव होते. काळाच्या पटलाआड दडलेल्या एकेक स्मृती जाग्या होऊ लागतात. विस्मृतीच्या अंधाऱ्या कोपऱ्यात विसावलेल्या एकेक आठवणी चालत येतात. जगण्याचं वर्तमान ज्याच्या उपकाराने भरलेलं आहे, त्याच्या आठवणीत बाप गहिवरतो. वर्तमानाच्या डोळ्यात भविष्याची स्वप्ने रुजवणाऱ्या गणेशच्या आठवणींनी मनाचं आभाळ भरून येतं. मातीआड गेलेल्या बैलाचे एकेक गुण बाप सांगू लागतो. खरंतर या मुक्या जिवाच्या जिवावर त्याचं घर सावरलं. राबणारे हात घरला घरपण देत होते. हातांच्या रेषांत नियतीने रेखांकित केलेलं प्राक्तन पालटण्यासाठी पायाचे तळवे झिजवणारा गणेश घरासाठी नुसता बैल कुठे होता? त्याच्या राबत्या पावलांच्या खुणांनी मळा बहरला. घरी येणारी लक्ष्मी गणेशाच्या कष्टाचं फलित होतं. पोटाला भाकरी अन् डोळ्यांना स्वप्ने देणाऱ्या गणेशाच्या उपकारांमुळे लेकराला शाळेची वाट सापडते. गणेश नसता तर आज उभा राहिला आहे, तेथे त्याला पोहचता आले असते का? रक्ताची नाती दुरावतात. सौख्याची सूत्रे बदलतात. समाधानच्या व्याख्या दिशा बदलतात. स्वार्थाने ओतप्रोत भरलेल्या जगाचे सगळे मालक. पण मतलबाच्या जगापासून कोसो दूर असणाऱ्या गणेशाच्या जिवावर सारंकाही उभं राहिलं. आयुष्याचं रामायण घडलं, पण जगण्यात राम आला. असे कोणत्या जन्माचे ऋण घेऊन गणेश घरात आला असेल? हे बापाला सांगता येत नसलं, तरी घरासाठी राबराब राबून गेलेला हा जीव आपल्या जीवात जीव टाकून गेला, हे त्याला विसरता नाही येत. नात्यांची वीण घट्ट असणारी उदाहरणे आजही आहेत, नाही असे नाही. पण हे सगळं दुर्मिळ होत चाललं आहे. स्वार्थपूरित जगण्यातील बदलणाऱ्या विचारांनी नात्यांना नवे आयाम दिले आहेत. काळाने माणसांना अडनीड वळणावर आणून उभे केले आहे. नात्यांचे पीळ सुटत आहेत. नवनव्या साधनांशी मैत्री होत आहे, पण निर्व्याज स्नेहाची सूत्रे हरवत आहेत. नाती जपण्यासाठी धडपड चालली आहे. ती तुटली म्हणून माणसे कासावीस होताना दिसत आहेत. आपापसातला संघर्ष दुरावा निर्माण करतोय. प्रसंगी चार पावले मागे येत नाती सांभाळीत माणसे टिकवून ठेवण्याचा काळ खूपच मागे राहिला आहे. माणसं भौतिक सुखांवर स्वार होऊन खूप पुढे निघून आली आहेत. माणसाला माणसेच सांभाळता नाही येत, तेथे मुक्या जिवांचा विचार करतोच कोण? नाही का? •• चंद्रकांत चव्हाण संवाद: ९४२०७८९४५५

परिचय

सदस्याचे पूर्ण नाव
लक्ष्मण शहादेव खेडकर
जन्मतारीख
01/06/1979
लिंग
पुरूष
शिक्षण
बीए डीएड
व्यवसाय
शिक्षक, शेती
E-mail (विरोप)
laxmankhedkar25@gmail.com
शहर
05 पन्नालालनगर पैठण
राज्य
महाराष्ट्रा
देश
भारत
आवडते कलाकार/लेखक/कवी

भास्कर बडे ,आप्पासाहेब खोत..

कालावधी

खरडवही
खरडवहीतील नोंदी पाहा
सदस्य कालावधी
5 वर्षे 6 months