Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



पुस्तक परीक्षण-रसग्रहण : अवकाळी विळखा (ग्रामीण कथासंग्रह )

लेखनप्रकार: 
समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०१६
लेखनविभाग: 
गद्य पुस्तक समीक्षण

पुस्तकाचे नांव : ‘अवकाळी विळखा’
लेखकाचे नांव : सचिन वसंत पाटील
प्रकाशक : गवळी प्रकाशन, इस्लामपूर, जि.-सांगली प्रथमावृत्ती- 13 फेब्रूवारी 2016,
ग्रामजीवनाचे वास्तव : अवकाळी विळखा
‘अवकाळी विळखा’ हा सचिन वसंत पाटील यांचा ग्रामीण कथासंग्रह गवळी प्रकाशन, इस्लामपूर यांनी नुकताच प्रकाशित केलेला आहे. समर्पक मुखपृष्ठ सत्यजित वरेंकर यांनी साकारले आहे. मलपृष्ठ मजकूर रंगराव बापू पाटील यांचा लाभलेला आहे.
सचिन वसंत पाटील हे एक यशस्वी ग्रामीण कथाकार म्हणून ओळखले जातात. अनेक नामवंत दिवाळी अंकांतून त्यांच्या कथा प्रकाशित आहेत. महाराष्ट्रातील अनेक मानाचे पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेले आहेत. आकाशवाणी वरून सतत कथाकथन चालू असते. वर्तमानपत्रांतून सतत त्याच्या साहित्याची चर्चा होत असते. ‘सांगावा’, हा ग्रामीण कथासंग्रह, ‘येरे येरे पैसा’, ‘पाय आणि वाटा’ हे त्यांचे लेखसंग्रह प्रकाशित आहेत. शेतातून चारा आणताना बैलगाडी पलटली. या अपघाताचा सचिनच्या मज्जातंतूला जोराचा धक्का बसला. त्याचे दोन्ही पाय जाऊन कायमचे अपंगत्व आले. सर्व प्रकारचे उपचार झाले. परंतु यश आले नाही. रात्रंदिवस बेडवर पडण्याशिवाय गत्यंतर नव्हते. अशाही अवस्थेत सचिनने जिद्द सोडली नाही. पुस्तकांची अगोदरची मैत्री घट्ट केली. आपल्या अपंगत्वावर मात करून त्याने साहित्यनिर्मिती करण्यासाठी लक्ष एकवटले. सुरुवातीच्या काळात बेडवर पडून राहून एका अंगाने तो लिहू लागला. नंतर नंतर वॉकरच्या सहाय्याने चालू लागला. ग्रामीण भागातील अनेक प्रश्‍नांची उकल त्यांच्या कथासंग्रहातून अनुभवावयास मिळते. हा निसर्गाचा चमत्कारच म्हटला पाहिजे.
‘टांगती तलवार’ या कथेत लेखकाने नामा या शेतकर्‍याची व्यथा चित्रित केली आहे. नामा दीड एकरातलं सोयाबीन काढून तयार असतं. परंतु त्याची मळणी होणे आवश्यक असतं. पावसाळी वातावरणात केंव्हा पाऊस येईल व ते सारे पीक भिजवून काढेल ही टांगती तलवार त्याच्यावर असते. रात्रंदिन त्याची झोप उडालेली असते. केंव्हा एकदा पीक निघते व बाजारपेठ गाठतो असे त्याला वाटत होते. कारण चालू वर्षी सोयाबीनला चांगला भाव आलेला असतो. अस्थिर मनोवृत्तीच्या नामाला बायकोने दिलेला चहादेखील कडू लागतो. बाळूभाऊच्या मशीनला अगोदरच दोघा तिघांनी बोलून ठेवले होते. शिवाय त्या दिवशी राबण्यासाठी गडीही मिळत नाहीत. जाधवाच्या टपरीवर जाऊन गड्यांसाठी धोंडोळा घेतो. नेहमी काम करणारे मन्सूर, धोंड्या, जगू, यांना इतर कामामुळे सवड होत नाही. जादा पैशाचे आमिष दाखवल्यावर श्यामा व राजा कसेतरी तयार होतात. गड्यांना तयार केले. तर इकडे बाळूभाऊचा मळणी मशीनचा ड्रायव्हर रजेवर. त्याचा मुलगा आजारी असतो. बाळूभाऊला धुळीची अ‍ॅलर्जी असते. गडी ठरवले पण आता मशीन नाही. नामाच्या पायाखालची जमीन सरकते. रात्रीचे जेवण जात नाही. बायकोच्या विचाराने तोच मशीन चालवायचे ठरवतो. बाळूभाऊ मशीन रानात आणून देतो. आपली बायको, मुले, गडी यांच्या सहाय्याने मळणीचे काम पूर्ण होते. तोच आकाशात ढग दाटून येतात. शेवटच्या टप्यात मळणी आल्यावरही नामाच्या जिवात जीव नसतो. येथेच लेखकाचे कथेचा शेवट केला आहे. या कथेत ग्रामजीवनाचे समस्त चित्रण येते. वर्षभर कष्ट करून आलेले पीक निसर्ग केंव्हा घास काढून घेईल याची खात्री शेतकर्‍याला नसते. याशिवाय मशीन, वेळेवर गडी न मिळणे, बाजारभाव याची चिंता असतेच.
‘वाट’ या कथेत पांडबाची व्यथा चित्रित केलेली आहे. त्याच्या दीड एकर रानात ‘ऐंशी-अकराचा’ ऊस पूर्ण वाढ झालेला. परंतु कारखान्याचे लोक नेण्यासाठी येत नाहीत. मुलीचे लग्न तर जवळ आलेले. उसाच्या पट्टीवर करण्याचा त्याचा विचार. ऑफीसला जाऊन चौकशी करतो. तेथेही ऊस तोडणीसाठी लोक थांबलेले असतात. आबा, तुकाराम चव्हाण अशी मंडळी. प्रत्येकालाच ऊसाची काळजी. आणखी काही काळ थांबले तर ऊस कुजणार. वर्षभर जोपासलेला ऊस जाणार. ऊस तोडणीसाठी वाटही आवश्यक असते. शेजारच्या सुभान पाटलाला तो वाट देण्याविषयी विनवणी करतो. परंतु पाटीलही त्यासाठी एकरी हजार रुपयाची मागणी करतो. तेही रोख. उसने-पासने करून पाटलाला पैसे दिले जातात. मग पांडबा मुकादमाची मनधरणी करतो. तोही एकरी पंधराशे रुपयाची मागणी करतो. अनेक अटी त्याला घालतो व कसाबसा रानात येतो.
पाला गोळा करायचा त्रास होतो म्हणून उसाला प्रथम आग लावण्यास मुकादम सांगतो. वर्षभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या ऊसाला आग लावण्याचे धाडस पांडबाला होत नाही. परंतु मुकादमाच्या दबावापुढे त्याचे काही चालत नाही. काळजावर दगड ठेवून तो आपल्या ऊसाला आग लावतो. पेटलेला ऊस त्याला पाहवत नाही. पाल्याबरोबर आपल्या ऊसाच्या कांड्याही जळू लागलेल्या लक्षात येताच तो वेड्यासारखा सैरभैर धावत सुटतो, कारण ऊसाची पार ‘वाट’ लागलेली असते. मनाला अस्वस्थ करणारी ही कथा केवळ पांडबाचीच व्यथा नसून. प्रत्येक ऊस-बागायतदाराची आहे. कारखानदारीकडून शेतकर्‍याची चाललेली लूट दर्शविणारी आहे. जाणून-बुजून ऊस उचलायचा नाही. शेतकर्‍याला हातघाईला आणायचे व त्याची अडवणूक करून त्याला लुटायचे. ही प्रवृत्ती बळावत आहे. म्हणूनच याच कथेतील तानाजी म्हणतो, ‘जेनं उठावं तेनं शेतकर्‍याला लुटावं....आरं हाय काय ह्या ऊस शेतीतऽ’ त्याला तुकारामही उत्तर देतो, ‘हायकी! कारखानदाराला साकरंची पोती नी शेतकर्‍याला मातुर त्वांड भरून माती...!’ या दोघांच्या संवादातच कारखानदार व शेतकर्‍यांचे संबंध स्पष्ट होतात. केवळ पाला उचलावा लागेल या किरकोळ सबबीतून मुकादम अख्खा ऊस पेटवून देण्याचे आदेश देतो. ऊस पेटवून देताना केवळ पालाच नाहीतर ऊसही पेटू शकतो हे त्याला ठावूक असूनही तो निर्दयीपणे हे कृत्य पांडबाला करावयास भाग पाडतो. यावरून ग्रामीण शेतकरी किती हतबल झाला आहे, हे दिसून येते. गड्यासाठी, वाटेसाठी, कारखान्यासाठी, ट्रॅक्टरसाठी, बैलगाड्यांसाठी, मुकादमासाठी त्याला अनेक जणांपुढे गयावया करावे लागते. पावलोपावली लाचार व्हावे लागते. ही हतबलता सचिनने अतिशय समर्पकपणे टिपली आहे. त्याच्या कथालेखनाला दाद दिलीच पाहिजे.
‘मैत्री’ या कथेत लेखकाने खेड्यात बदललेल्या मानसिकतेचे अचूक चित्रण केलेले आहे. पूर्वीचे शेतकरी कष्ट करायचे. ढोर मेहनत करायचे. सकाळी सुर्योदयापुवी उठून शेतात जायचे. शेरडा-म्हसरांची बूज राखायचे. पण अलीकडे खेड्यातील वातावरणही गढूळ झाले आहे. नवीन पिढी उदयास आली आहे ती आळस घेऊनच. ती शिकली. अंगाला माती लागू देईनाशी झाली. परिटघडीचे कपडे, कोंबडा भांग, किमान दुचाकी गाडी, भारी मोबाइल व गॉगल घालून फिरू लागली. शेतावरील देखरेख म्हणजे उंटावरून शेळ्या राखणे. एखाद्या पुढार्‍याच्या दावणीला बांधून स्वत:ला धन्य समजू लागली. कमी कष्ट, जास्त पैसा या अमिषेपोटी ऐतखावूपणा वाढला. चैन वाढली. व्यसने वाढली. बिनकष्टाचे व झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग शोधू लागली. याच मानसिकतेचा फायदा घेत मुंबई, बेंगलोर, कलकत्ता येथील काही कंपन्या दाखल हेातात. साखळी मेंबर करायचे, प्रमोशन द्यायचे. पैसे दामदुप्पट करायचे. एकवीस नख्यांचे कासव मिळवून पैसे मिळवायचे. ‘एखादे चंदनाचे किंवा आंब्याचे झाड लावले आहे. ते मोठे झाल्यावर फळे तुमची’ म्हणून पैसे उकळायचे. नंतर झाडही तिकडेच पैसेही तिकडेच. गावात मटक्याच्या बुक्कीने कहर केलेला. एका रुपयाच्या बदल्यात एकशे दहा रुपये म्हटल्यावर अनेक तरुण पोरे आकडेमोड करून पैसे मिळू लागतात. एखाद दुसरा लागतोही. पण नाद लागलेला सुटत नाही. हळूहळू किती पैसा जातो हे समजत नाही. ‘स्लो-पॉयझन’ प्रमाणे तरुण पैसे घालवू लागतो. क्षणिक आनंदाच्या मोहात गुरफडतो. हळूहळू बरबाद होतो. अशी व्यसनाधीन झालेली पिढी भविष्यात काय करू शकणार? याची चिंता वाहणारी ही कथा आहे. या कथेत नामदेव व सुधाकर दोघे मित्र. नामदेवने जुन्या व दुर्मीळ नाणी-नोटांचा संग्रह केलेला असतो. त्या संग्रहात पाच हरिणे असलेली नोट एक पाहुणा चार लाख रुपयाला मागतो. परंतु आपला अवयव तोडून दिल्यासारखे वाटल्याने नामदेव त्या चार लाख रकमेवर पाणी सोडतो. त्याचा मित्र सुधाकर काहीतरी खोटी सबब सांगून काही वेळासाठी म्हणून नामदेवला भावनाविवश करून त्याच्याकडून ती पाच हरिणांची नोट घेतो व त्याला नंतर देत नाही. मित्राने दिलेला दगा नामदेवच्या जिव्हारी लागतो. केवळ पुस्तके व साहित्य त्याला या धक्क्यातून सावरतात.
‘अवकाळी विळखा’ या कथेत अवकाळी पावसाने शेतकर्‍यांना काढणीसाठी उसंत मिळत नाही. अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकर्‍यांची पिके धोक्यात आली. काढणी, मळणीला सवड न मिळाल्याने शेतकरी चिंतीत होतो. ऊस, हळद, द्राक्षे, केळी या पिकांची काढणी होईल व चार पैसे हातात मिळावेत, देणेकरी भागावेत, नव्या दमानं नव्या पिकाची घातीपरमाणं पेरणी व्हावी असं त्यांना वाटत होतं. पण तसे होत नाही. काढून टाकलेल्या रानातल्या भाताच्या सोयाबीनच्या कडप्या उलथून-पालथून काव आला होता.हाता-तोंडात आलेली अशी पिके पावसात कुजताना पाहताना शेतकर्‍यांना अन्न गोड लागेना. धड झोप येईना. ओल्या दुष्काळाने ग्रासलेल्या शेतकर्‍यांची ही कथा वाचून मन थक्क होते. कोरडा दुष्काळ असो अथवा ओला दुष्काळ मरण शेतकर्‍याचेच. ज्येष्ठ साहित्यिक सदानंद देशमुख यांचे एक वाक्य लेखकाने आवर्जून नमूद केले आहे. ‘पाणीवाल्यांची पाण्यानं खरडपट्टी होते अन् कोरडवाहू वाल्यांची बिनपाण्यानं होते एवढाच फरक...’
सरकारही दुष्काळसदृश्यांसाठी अनेक घोषणा करते पण त्या हवेत विरणार्‍या होत्या. दोन-दोन वर्षांपूर्वीच्या नुकसान भरपाया अजून मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे शासनाकडून तर शेतकर्‍यांची अपेक्षा नव्हती. सुमारे पंधरा दिवस हा अवकाळी पाऊस कोसळतो व पुढचे तीन आठवडेभर राना-रानात चिखल साठलेला असतो. पंचायतीच्या कट्ट्यावर बसून श्रीपती, हणमा, आंधळा तुकाराम, महादेवबापू, राज्या, रावसो खोत, महादेव चौगुले, श्रीपती पाटील, हणमा, सुभानराव पाटील, महादेव माने या समस्येची चर्चा करतात. निष्कर्ष निघतो-प्रगतीच्या नावाखाली, सुधारणांच्या नावाखाली माणसानं जंगलावर अतिक्रमणे केली, झाडे तोडली. प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाली. स्वातंत्र्यापूर्वी अडतिस टक्के जंगल होते ते आता सतरा टक्क्यावर आलंय. रासायनिक खतांचा बेसुमार वापरानं जमिनीचा पोत खराब होत आहे. वृक्षतोडीमुळे निसर्गचक्र बिघडत आहे. प्रत्येकाने यापुढे वृक्षलागवड केली पाहिजे. रसायनिक खतांऐवजी सेंद्रीय खतांचा वापर केला पाहिजे. तरच पुढच्या पिढीला अशा समस्यांपासून सुटका आहे. असा निष्कर्ष निघतो.
याशिवाय त्यांच्या ‘उद्रेक’, ‘बुजगावणं, ‘सांभाळ रे’ या कथाही उल्लेखनीय आहेत. ’एकंदर सचिन वसंत पाटील यांचा शेतीविषयक दृष्टिकोन व निरीक्षण बारकाईचे आहे. भाषा सहज व ओघवती आहे. ती वाचकांच्या मनाची पकड घेते. प्रत्येक कथेत ते त्यांच्या वर्णनावरून दिसून येते. प्रत्येक विचार शेतकर्‍यांची चिंता वाहतात. ग्रामसंस्कृतीचे रक्षण करू पाहतात. भाषाशैली प्रवाही असून संवाद खटकेबाज आहेत. ग्रामभाषेत वापरल्या जाणारे अनेक संवाद त्यांच्या कथेत येतात उदा.- ‘पोराचं बोल ऐकून पोटा खड्डा पडला’, ‘तोंडातला घास गिळवेना’, ‘पण कधी कधी शेळपट मनात एक विचार मुंगीच्या पावलाने शिरतो.’, ‘कडूइक च्या पिऊन तो मळणीला गडी माणसं हुडकायला म्हणून बाहेर पडला’, ‘पाण्याविना पिकं वाळून निघालेत पण पावसाला दया नाही.’, ‘...पण ह्यो मिरगीचा किडा एवढ्या उशिराने कसा काय आला म्हणायचा?’, ‘आता सावज जाळ्यात आलंय तर दोर खेचायला पाहिजे.’, ‘पोरगा गेला आसंल गावभर उकिरडं फुकायला.’ अशी ग्रामीण भाषेतील अनेक वाक्ये सचिनच्या कथेत सहज येताना दिसतात. कथेतील सर्व पात्रे ही सहजभावनेनं वावरतात. कधी आक्राळस्तेपणा करतात तर कधी संयमीपणाही दाखवतात. मानवी जीवनमूल्यांची जिवापाड जपणूक करताना दिसतात.
सचिन पाटील यांना अपंगत्व आले असले तरी नियतीने त्यांच्यात प्रतिभाशक्ती खूप मोठ्या प्रमाणात दिली आहे. अपंगत्वावर मात करून त्यांनी ‘अवकाळी विळखा’ सारखी सकस निर्मिती केली आहे. आपल्या आलेले अपंगत्व हे सचिनने आपत्ती न समजता ती इष्टापत्तीत बदलली आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आपल्या अपंगत्वाने सहानुभूती न मिळवता त्याने हा साहित्याचा मोठा राजमार्ग धरलेला आहे, तो धडधाकट व्यक्तीलाही जमत नाही. सचिनने आपल्या आयुष्यात असेच लिहीत राहवे. त्याच्या भावी आयुष्यास व साहित्यसेवेस सुयश चिंतितो.
***
राजेंद्र भोसले
ब/93, आनंदयात्री, राजस्वनगर, विजापूर रोड, सोलापूर-413 004
मो.-9881786466
Email: bhosale.rajendra.b@gmail.com

Share

प्रतिक्रिया