Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



५ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन.... जाणीवांची समृध्द अनुभूती

लेखनप्रकार: 
अभिप्राय

५ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन ---- जाणीवांची समृध्द अनुभूती

दि. २ व ३ फेबृवारी २०१९ रोजी पार पडलेलं दोन दिवशीय संमेलन हे समकालीन साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक अर्थानं आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले.
शेती अर्थ प्रबोधिनी, युगात्मा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आणि बळीराजा डॉट कॉम यांच्या संयुक्त विध्यमाने गत चार वर्षापासून वर्धा ,नागपूर, गढचिरोली,मुंबई,आणि नुकतेच संत एकनाथ महाराजाची कर्मभूमी असलेल्या पैठण नगरीत आयोजित केवळ शेतकऱ्याचे साहित्य आणि शेतकऱ्याच्या साहित्याचे संमेलन अशी वावरातील अस्सल जाणिवांची समृध्द अनुभूती, शेतीवर प्रेम करणाऱ्या,मातीशी अतूट सांगणाऱ्या,मातीवर लिहणाऱ्या समस्त महाराष्ट्रातील सारस्वताना देवून गेली .
आजपर्यंत झालेल्या चारही संमेलनापेक्षा पाचवे संमेलन हे अनेक अर्थाने वेगळे ठरून नवीन पायंडे साहित्य विश्वात रुजण्यास हातभार लावण्यास निर्णायकरीत्या यशस्वी झालेले आहे असे मला वाटते.
सतत दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या मराठवाड्यात होणारे पहिले संमेलन असल्याने याची उत्सुकता स्थानिक,शेतकरी बांधव,कार्यकर्ते,शेतकरी नेते आणि साहित्य विश्वातील सारस्वतांच्या कौतूकाचा विषय ठरल्याने मराठवाडयासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधींनी आवाजून हजेरी लावलेली होती.
खास आकर्षणाची सुरवात दि. २ फेबृवारी म्हणजे संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी निघालेल्या भव्य ग्रंथदिंडीने ज्यात अबालवृदासह शाळेतील चिमुकल्याच्या शिस्तबध्द लयबध्द पदन्यासाने ताल मृदुंगाच्या साथसंगतीसह संत एकनाथ महाराजांच्या भजन भारुड अभंगातून अवघी पैठण नगरी दुमदुमली.
उद्घाटन सत्रात आपल्या प्रास्ताविकात संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री. गंगाधर मुटे सरांनी गत चारही संमेलनाचा आढावा घेताना शेतकऱ्याच्या दु:खाची सुखाची त्याच्या एकूणच जगण्याची,संघर्षाची सुत्रबध्दपणे अस्स्लतेने साहित्यातून मांडणी आजवरच्या समग्र शेतीप्रधान साहित्यातून जगद्गुरू संत तुकाराम महाराज,महात्मा फुले आणि पुढे युगात्मा शरद जोशी यांनी शेतकरी चळवळीच्या रूपाने आंदोलनास सहायभूत ठरणारे केलेले लेखन आणि काही हाताच्या बोटावर मोजता येईल अश्या शेतकरी कार्यकर्ते यां खेरीज केली गेलीच नाही.तेव्हा आता आपल्याला आपली लटकी पुचाट वाणी सोडून शिरजोर व्हावे लागेल, आणि क्रांतीची ज्योत मनामनात पेटविण्याकरीता साहित्यिकानी आपल्या लेखण्या परजून ठेवाव्यात. असं लेखण्या परजन्याचं काम यां पाचव्या साहित्य संमेलनातून घडावे असा आशावादही उपस्थितांच्या मनात जागविला.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष अड. सतीश बोरूळकर साहेबानी आपल्या काव्यमय संवादातून एकुणच शेती चळवळ आणि साहित्याची उपजावू मशागत करून पुढील साहित्यिक पेरणी करीता संमेलनरुपी वावर तयार केले.संमेलनाचे अध्यक्ष प्रसिध्द कवी साहित्यिक आ. इंद्रजीत भालेराव सर आपल्या अध्यक्षीय मनोगतात पैठण नगरी आणि येथील सातवाहन राजघराण्याची ४६० वर्षाची समृध्द अशी शेती परंपरा आणि गाथा शप्तशती सारख्या केवळ शेतकरी जीवनाची वास्तविकता मांडणाऱ्या ग्रंथाच्या निर्मितीमागील असलेल्या शेतीनिष्ठ समृद्ध जाणीवा याचा परिचय करून देताना, अश्या नगरीत शेतकरी साहित्य संमेलन व्हावे हि एक विशेष महत्वाची घटनाच असल्याचे प्रतिपादन केले.पुढे बोलताना भालेराव सर म्हणाले “मि तुमच्याशी संवाद साधायला आलेलो आहो याचा मला आनंद होतो.मी तुमच्यापेक्षा वेगळा नाही.माझ्या कविता चळवळीच्या उपयोगी पडल्या,आणि युगात्मा शरद जोशी साहेबाना त्या आवडायच्या यां एकाच योग्यतेमुळे आज मि इथे बसलो आहे”. अध्यक्ष्यांच्या यां चळवळीशी नाते सांगणाऱ्या विनम्र भुमिकेने उद्घाटन सत्रातचं संमेलनाला एक विधायक दिशा मिळून साहित्यिक,श्रोता, अभ्यासक,कार्यकर्ते,कवी यातील अंतर एका क्षणात कमी होवून भावनिक वातावरणाची निर्मिती आपसूकच पुढील दोन दिवसात सत्रागणीक होत गेली.
कोणत्याही साहित्य संमेलनात कवीसंमेलनाचे आकर्षण असतेच परंतू येथे मात्र वेगळेच दृष्य बघायला मिळाले. सुमारे चार तास रंगलेल्या यां कवीसंमेलनात तब्बल चाळीस कवींनी शेती यां एकमेव विषयाला आपपल्या प्रतिभेने न्याय देवून शेती मातीशी आपल्या जाणीवा जागवत जगाच्या पोशिद्याचं जगण मरण आणि संघर्षाला विलक्षण ताकतीने वाचा फोडली.मुख्य म्हणजे गेय कवितांचे प्रमाण जास्त असल्याने संमेलन रंगत गेले. कविसंमेलनाची सुरवात अकोला येथील सुप्रशिध्द वर्हाडी कवी श्री श्याम ठक यांच्या “बाप वावर पेरते” यां दुर्दम्य आशावाद जागविणाऱ्या कवितेनंच झाली.दोन सत्रात झालेल्या कविसंमेलनाचे सूत्र संचालन प्रसिद्ध कवी श्री. लक्षमण खेडेकर आणि प्रख्यात सूत्रसंचालक कवी चाफेश्वर गांगवे यां व्दयीने अत्यंत शिस्तबध्दपणे कवींना बोलते केले.कवी संमेलनाच्या अध्यक्ष्या म्हणून लौकिक अर्थाने निरक्षर परंतू विलक्षण प्रतिभेच्या धनी शीघ्रकवी मराठवाड्याच्या बहिणाबाई अशी ओळख असलेल्या आदरणीय राधाबाई कांबळे (बीड) ह्या होत्या.यां ठिकाणी एक नमूद करावेशे वाटते जिथे कवी संमेलनाचा अध्यक्ष कुणीतरी प्रसिध्द प्रा.डा.किंवा प्रख्यात कवी पाहण्याची आणि कवितेची आखीव रेखीव सैधान्तिक मांडणी वैगरे ऐकण्याची सवय झालेल्या काळात अध्यक्षीय समारोपातील आ. राधाबाईनी उपस्थितांशी आपल्या सहज सुंदर शैलीतून साधलेला संवाद आणि सादर केलेल्या कवितेने संमेलनाची भावनिक उंची वाढवीली.आम्हा सर्व कवींच्या चेहऱ्यावर समाधानचे विलक्षण तेज तळपत होते.कारण तेवढीच प्रामाणिक भरभरून दाद प्रत्येक कवीच्या कवितेला उपस्थितांकडून मिळालेली होती.
दिवसभराच्या बैठकीने आणि बरेच साहित्यक, प्रतिनिधी लांब प्रवास करून आल्याने काहीशे थकलेले होतेच, चला आता दिवसाची सांगता झाली. असे मनोमन ठरविलेल्या क्षणीच आयोजकाकडून वेगळ्याच कार्यक्रमाची सूचना करण्यात आली.भरपेट सुग्रास भोजनाचा आस्वाद घेवून हळूहळू श्रोते हॉल मध्ये जमायला लागले.आणि काय ... बसू थोळा वेळ अन जावू निघून अश्या काहीश्या भावनेने आलेले श्रोते तब्बल अडीच तास जागेवरून चक्क हललेच नाही.हि बाब अभूतपूर्वच.कारणही तसेच होते.अक्षौश्वर ,दिव्यदृष्टी कलाकार मुंबई प्रस्तुत अंध कलाकारांचा शेतकरी संगीत रजनी हा अत्यंत वेगळा (वेगळा अश्यासाठी कारण अश्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन समकालीन संमेलनात रात्री आढळत नाही) असा भावविभोर करणारा कार्यक्रम यातील सर्व कलाकार हे अंध असून देखील एखांद्या कसलेल्या व्यावसायिक कलाकाराप्रमाणे त्यांनी आपल्या गायन वादन आणी तेवढयाचं उत्कृष्ठ प्रासंगिक निवेदनातून गीतांचे सर्व प्रकार लिलया पेलले.मुख्य म्हणजे शेती ,माती ,गांव,आणि शेतकरी असा समग्र गीतांचा बाज असल्याने सभागृहातील प्रत्येक श्रोता हा त्यांच्या स्वरगंगेत न्हाऊन निघून त्यांच्याच गावचा केव्हा होवून गेला हे कळलेच नाही .यां ठिकाणी एक आठवण म्हणून सांगावेशे वाटते गढचिरोली येथील तिसऱ्या संमेलनातही पहिल्या दिवशी रात्रीच्या सत्रात झाडीबोलीतील शेतकरी जीवनावरील नाटीका सादर करण्यात आलेली होती. शेतकरी साहित्य संमेलनाचे हे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात एक अत्यंत गंभीर विषयावरील प्रगल्भ असा परिसंवाद अनुभवण्यास मिळाला. विषय होता “शेतीप्रधान साहित्य आणि साहित्यिक “खरं म्हणजे शेतकरी साहित्य संमेलन भरवून,लोकं जमवून,एवढा खर्च करून,खऱ्या अर्थाने शेतकर्यांची स्थिती ,किंबहुना त्याच्या जीवनात काही बदल घडू शकते काय? यां बाबत काहीश्या संभ्रमावस्थेत असलेल्या खूद्द साहित्यिकांच्या ,प्रतिनिधींच्या,श्रोत्यांच्या,आणि एकूणच उपस्थितांच्या मनात असलेल्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यास यां परिसंवादातून दिशा मिळाली असे मला वाटते.कारण युगात्मा शरद जोशी नेहमी म्हणायचे साहित्यिकांनी जर आपल्या लेखण्या आंदोलनाच्या दिशेने वळविल्या असत्या तर आंदोलनाला वेगळीच धार मिळाली असती.याबाबतचा त्यांचा अंगारमळ्यातील एक लेखही प्रसिद्ध आहे “मी साहित्यिक नाही“ ज्यातून त्यांनी साहित्यिक कसा असावा लेखनिची ताकत काय असावी याबाबत मार्मिक विवेचन केलेले सर्वश्रुत आहेच.आपण जाणतो जेव्हा जेव्हा साहित्यिकांची लेखणी आंदोलनाच्या बाजूने सरसावली तेव्हा तेव्हा मोठ मोठी सिंहासने डगमागयाला लागलेली असल्याच्या इतिहास आहेच.
यां परिसंवादात डॉ भास्कर बढे आणि इतर मान्यवरांनी विषयाला यथोचित न्याय देत सूत्रबद्धपणे एकूणच शेती साहित्य परंपरा यांची व्यक्तिगत उदाहरणासह अर्थपूर्ण ओघवत्या शैलीत मांडणी केली.सत्राचा अध्यक्षीय समारोप करताना प्रा-डा.ज्ञानदेव राउत यांनी शेती साहित्य आणि शेतकरी असा समग्र आढावा घेताना शेतकरी प्रणित साहित्यातील नवनव्या जाणीवा त्यांचा संघर्ष ,अनेक वास्तवादी लेखन करणारे महाराष्ट्राच्या विविध भागातील सशक्त कवी साहित्यिकांचा त्यांच्या रचनेसह उपस्थितांना परिचय करून दिला. शेती साहित्य म्हणजे ग्रामीण साहित्य अशी सरमिसळ असलेल्या दृष्टीकोनाला आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून उपस्थितांना विचार करायला प्रवृत्त करण्याचे काम केले,मुख्य म्हणजे का लीहले पाहिजे ? लिहलेले कुणी वाचतो काय? वाचल्याने काही फरक पडू शकतो काय? अश्या सर्व प्रश्नाची ची उत्तरे देण्याचा प्रयत्नही केला.आज वाचणारी लिह्णारी पिढी खेड्यापाड्यात निर्माण होत आहे.गरज आहे त्यांना योग्य व्यासपीठ देण्याची.त्यांच्या शेतीनिष्ठ जाणीवा शहरात राहणाऱ्या लोकांपर्यत पोहचण्याची.कारण मुख्यत: पैशे खर्च करून वाचणारा सशक्त वर्ग शहरात राहतो. परंतू शेतीसाहित्याच्या नावाने जे साहित्य त्यांच्यापर्यत पुरविण्यात येते ते बऱ्याच अंशी काल्पनिक आणि मुटे साहेब म्हणतात तसे आभाशी स्वरूपाचे असल्याने खऱ्या अर्थाने वास्तविकतेशी तो भिडत नसल्याने, शेती आणि शेतकरी यां बाबतची उदाशिनता इतकी निरस होते कि वर्तमानपत्रातील एखाद्या शेतकऱ्याची आत्महत्या म्हणजे एखाद्याचा जीव जातो ,घराचा कर्ता गमावतो,त्या घराचं मातेरं होतं. इतकी संवेदनशील बाब सुद्धा नित्याचीच बातमी होवून जाते.कारण यां आत्महत्येमागील वास्तव त्यांच्या पर्यत खऱ्या अर्थाने पोहचलं नसतं.हे वास्तव मांडण्याच,फक्त वास्तव मांडण्याचं कामच नव्हे, तर त्यांच्यात आशा जागविण्याचं,प्रेरणा निर्माणाचं,मुख्य म्हणजे त्याला माणूस म्हणून समजून घेण्याचं काम साहित्यातून व्हायला पाहिजे, जे राउत सरांनी विविध दाखल्यासह दाखवून देलेले आहे.हात लिहते होत आहे. पण ते काम मोठ्या प्रमाणावर व्हावं आणि समाजापर्यंत अस्सल रुपात जावं.ज्यातून शेतकरी आणि यां चळवळीकडे सुशिक्षित समाजाचा सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होईल, हि दरी सांधली गेली पाहिजे. हा परिसंवाद मला पर्वणीच वाटला.
यानंतर इतर कोणत्याही व्यासपिठावर सादर न होणारा असा केवळ आणि केवळ शेती विषयाला वाहिलेला शेतकरी गझल मुशायरा संपन्न झाला. शेती सारख्या रुक्ष विषयावर गझलेसारखी अलवार भावनेची अनुभूती देणारी विधा किती स्पोटकपणे भाष्य करू शकते हे मुटे सरांच्या “गझल माझी निराळी”यां संग्रहाने दाखवून दिलेले आहेच. ज्याची पाठराखण दस्तुरखुद्द गझलनवाज आ.भीमराव पांचाळे सरांनी केलेली आहे.शेतकरी गझल मुशायऱ्यात महाराष्ट्रातील अनेक नामवंत गझलकारासमवेत नव्याने लिह्णारे गझलमित्रही सामील झालेले होते. विशेषत: मराठवाड्यातील गझलकार बहूसंखेने असल्याने आत्मीयतेची भावनाही स्पर्शून गेली, प्रथमच सूत्रसंचालन करणारे आ .आत्माराव जाधव सरांनी अतिशय उस्फुर्तपणे संपूर्ण मुशाऱ्याचे संचालन केले. मुशायऱ्याचे अध्यक्ष जेष्ठ गझलकार आ. मसूद पटेल यांनी आपल्या आशयघन सामाजिक जाणीवांच्या रचनांनी उपस्थितांना खिळवून ठेवले.विशेष म्हणजे केवळ शेतकरी संमेलनातील सातत्यपूर्ण सहभागाने डा रविपाल भारशंकर आणि धीरजकुमार ताकसांडे हे आमचे कविमित्र, सशक्त अशी गझल लिहू शकल्याची त्यांनी दिलेली कबुली संमेलनाचे वेगळेपण सांगून जाण्यास पुरेशी आहे. शेतकरी गझल मुशायरा ही संकल्पना साहित्य विश्वात रुजविण्याचे काम या शेतकरी साहित्य चळवळीने केलेले आहे असे म्हणणे अतिशोयोक्ती ठरणार नाही.याची मला जाणीव आहे.
शेवटच्या समारोपीय सत्रात संमेलनाच्या निमित्याने लेखनास प्रवृत्त करण्याकरीता आयोजित विश्वस्तरिय लेखन स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला. स्पर्धा म्हटली की नियम येतोच इथे एक विशेष बाब नोंदविण्यासारखी हि कि स्पर्धेच्या अंतिम दिनांकाची मुदत संपलेली असताना, पैठण येथील अल्प भूधारक शेतकरी कुटूबातील कू.कोमल भुजबळ यां १० वीतं शिकणाऱ्या मुलीने स्पर्धेतील विषयानुसार एक अत्यंत मार्मिक लेख लीहला होता आणि तिच्याकडे मोबाईल नसल्याने तो तिने विहित मुदतीत संकेत स्थळावर टाकणे तिला माहीतच नव्हते. आणि अश्या परीस्थितीत तो हस्तलिखित लेख मुटे सरांनी संमेलनाच्या ग्रुप वर वाचायला टाकला आम्ही वाचून अंतर्मुख झालो आणि सर्वानुमते यां लेखणीचा सत्कार केला पाहिजे असे ठरले आणि जेष्ठ गझलकार,कादंबरीकार रमेशजी सरकाटे सरांनी आपल्या आईच्या नावे शेवंताबाई सरकाटे प्रतिष्ठान तर्फे रोख १००० रु आर्थिक मदत देवून लेखन स्पर्धेतील उत्तेजनार्थ असा पुरस्कार देण्यात आला.हि घटना ह्या जाणिवा संमेलनाला वेगळ्या उंचीवर घेवून जाते असे मला वाटते. एखांद्या संमेलनाच्या निमित्याने विश्वस्तरीय लेखन स्पर्धा आयोजित करणे हे ही शेतकरी संमेलनाचे वेगळेपण म्हणावे लागेल.शेवटी समारोपीय सत्र गाजविले ते शेतकरी संघटनेचे माजी आमदार श्री वामनराव चटप यांनी आपल्या धगधगत्या वाणीने उपस्थित श्रोत्यांना आता लढण्यास तयार व्हावे. वेळ आलेली आहे साहित्य संमेलनाच्या आयोजनाचे कौतुक करून हि साहित्य चळवळ पुढेही निष्ठेने चालविण्याकरीता नव्या लेखकांनी लिहावे आपापल्या परीने वास्तवाशी भिडावे असे सांगून ..शिक बाबा शिक आता लढायला शिक अशी दिशादर्शक जाणीव मला समृध्द करून गेली.

रविंद्र अंबादास दळवी
२०२ श्री वल्लभ अपार्टमेट
विधाते नगर ,पखाल रोड
वडाळा शिवार , नाशिक ४२२००६
९४२३६२२६१५

Share